कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर शरद पवार यांनी अखेर सोडलं मौन
नवी दिल्ली - कृषी कायद्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती आरोप केला होता. युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झालं असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोमवारी पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर टीका केली होती. पवार यांची भूमिका दुपट्टी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्यावर पवार यांनी आज भाष्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली. दोघांमध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.शरद पवार म्हणाले की, ते पत्र कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात लिहिलेलं होतं. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं, पवार यांनी यावेळी विषय भरकटवण्यासाठी हे केलं जात असल्याचाही आरोप केला. याला जास्त महत्व देऊ नका असंही ते म्हणाले.
शरद पवारांनी आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगत अधिक बोलण टाळलं. मात्र पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने शरद पवार संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले.पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात आपण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.