वसंतदादा बँकेच्या चुकीमुळे ढवळे यांची आत्महत्या - खा.ओमराजे राजेनिंबाळकर

 
वसंतदादा बँकेच्या चुकीमुळे ढवळे यांची आत्महत्या - खा.ओमराजे राजेनिंबाळकर

उस्मानाबाद - .वसंतदादा नागरी सहकारी बँक व्यवस्थापनाच्या विरोधात आपण  ढवळे यांच्या बाजूने भांडणारा होतो. त्यामुळे ढवळे कुटुंबाला न्याय मिळावा अशी माझी प्रामाणिक इच्छा असून त्यासाठीच या प्रकरणाचा लवकरात लवकर निपटारा व्हावा व निपटारा झाल्यास सर्व सत्यता समोर येईल, असा स्पष्ट निर्वाळा खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अन्वय नाईक यांच्याप्रमाणे आर्थिक फसवणुकीमुळे आत्महत्या केलेले कसबे तडवळे येथील शेतकरी कै. दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या आरोपींना अटक करावी  व अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांना ज्या पद्धतीने न्याय दिला त्याच पद्धतीने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मयत दिलीप ढवळे यांच्या पत्नी वंदना ढ़वळे आणि ढ़वळे  कुटुंबियाने पत्रकार परिषदेत दुपारी केली होती. खासदार ओमराजे हे  पोलीस यंत्रणेवर मोठा दबाव टाकत असून त्यामुळे  न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होत नाही. त्यामुळे ओमराजे यांना अटक करावी अशी मागणीही ढवळे कुटुंबियांनी  केली होती. 

मुख्यमंत्री साहेब, अन्वय नाईक कुटुंबियां प्रमाणे न्याय द्या !


त्यानंतर खासदार ओमराजे यांनी आपली बाजू मांडली . ते  म्हणाले की, तेरणा कारखान्यावर ३५- ४० कोटी रुपयाची देणे असल्याने कारखान्याची पत नसल्यामुळे कोणत्याही बँका कर्ज देण्यास धजावत नव्हत्या.  त्यामुळे तेरणा कारखान्यास पुरवठा करणाऱ्या दिलीप ढवळे यांच्यासह  इतर ४० ठेकेदारांना वसंतदादा नागरी सहकारी बँकेने कर्ज दिले होते.  मात्र कर्ज देताना सदरील कर्ज कारखान्याच्या नावे न देता संबंधित व्यक्तींच्या नावे देऊन गहाण खत म्हणून त्यांच्या जमिनीवर बोजा चढविण्यात आलेला होता. 

सदरील ठेकेदारांनी तेरणा कारखान्यास काम केल्यास त्यांच्या कामाच्या प्रमाणात कर्जाची घेतलेली रक्कम वसंतदादा बँकेला देण्यात येईल असा करार देखील करण्यात आलेला होता. मात्र त्यापैकी ढवळे यांच्यासह ११ ठेकेदारांनी काम केले. त्यामुळे काम केलेल्या लोकांचे पैसे देखील वसंतदादा बँकेकडे डीडीद्वारे वर्ग केले. मात्र वसंत दा बँकेने अकरा लोकांचे पैसे जमा करून त्यांच्या सातबारावरील बोजा कमी करण्याऐवजी ४० लोकांच्या नावे सदरील रक्कम समप्रमाणात वर्ग केली व त्यामुळे ढवळे यांच्यासह इतरांच्या शेतावर बँकेचा बोजा कमी होण्याऐवजी तसाच राहिला.

 वास्तविक ढवळे यांनी काम काम केल्यामुळे त्यांचे कर्ज फेडण्यासाठी बँकेकडे रक्कम वर्ग केलेली असताना देखील बँकेने उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी त्यांना नोटीस देऊन जमीन जप्त करून लिलाव करण्याची  प्रक्रिया अवलंबिली होती. यामुळेच ढवळे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले . ही फार दुर्दैवाची घटना असून कुटुंब प्रमुख गेल्यानंतर काय संवेदना होतात? याची जाणीव खुद्द मला असून मी देखील या घटनेमुळे सुन्न झालो होतो असे त्यांनी सांगितले. 

 कसबे  तडवळेचे आत्महत्याग्रस्त शेतकरी कै.दिलीप ढवळे यांची कोणतीही चूक नव्हती. त्यांच्यासह इतर अकरा शेतकऱ्यासाठी आपण  डीडीआर, जेडीआर व उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल करून त्यांच्यासाठी लढा दिला . ढवळे यांच्या आत्महत्यानंतर माझ्यासह इतरांवर पोलिसात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर आम्ही  न्यायालयात हजर झाले असता आम्हाला न्यायालयाने अटकपूर्व जामीन देखील मंजूर केला आहे. त्यामुळे पुढील तपास लवकरात लवकर पूर्ण करून चार्जशीट न्यायालयात दाखल करून  या प्रकरणाचा लवकरात लवकर निपटारा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
 

From around the web