उस्मानाबाद तालुक्यात धान्य दुकानदारांचा काळाबाजार

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर आणि तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार आलेला माल गोरगरीब जनतेला वाटप न करता सरार्स काळाबाजार करीत आहेत. तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी संगनमत करीत आहेत. त्यांच्याकडून दरमहा हप्ता घेत आहेत. रेशन दुकानदाराकडून आलेले कलेक्शन तहसील कार्यलयातच मोजले जात आहेत. त्याचा व्हिडीओ उस्मानाबाद लाइव्हच्या हाती लागला आहे.
उस्मानाबाद शहरात एकूण ३५ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. शहर आणि तालुका मिळून २११ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांच्याकडून किमान दरमहा तीन हजार रुपये हप्ता घेतला जात आहे. त्याचे एकूण कलेक्शन सहा लाख ३३ हजार होत आहे.त्याचे वाटेकरी ठरलेले आहेत.वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यात गुंतलेले आहेत. त्यामुळे 'अंधेर नगरी चौपट राजा' अशी परिस्थिती आहे.
असा केला जातो काळाबाजार
गोरगरीब शिधापत्रिका धारकांना दरमहा गहू, तांदुळ, साखर, डाळ वाटप करण्यासाठी प्रत्येक दुकानदारांना कोटा दिला जातो, मात्र एकाद्याच्या नावावर १५ किलो धान्य असेल तर दहा किलोच दिले जाते. प्रिंटर खराब असल्याचे कारण सांगून पावती दिली जात नाही. तसेच दुकान कधी उघडले जाते तर कधी नाही अशी परिस्थिती असते. धान्य अजून आले नाही म्हणून नेहमी परत पाठवले जाते.
कोरोना लॉकडाऊन काळात अनेक गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली. शासन एकीकडे मोठ्या प्रमाणात धान्य पाठवत असताना, त्याचे वाटप न करता धान्याचा काळाबाजार करण्यात आला. त्यात रेशन दुकानदार आणि पुरवठा अधिकारी मालामाल झाले.
असे केले जाते कलेक्शन
तुम्ही तिकडे काळाबाजार करा, आम्हाला दरमहा तीन हजार रुपये हप्ता द्या, असा अलिखित आदेशच असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार निर्ढावले आहेत. कलेक्शन करण्यासाठी पुरवठा अधिकऱ्यांनी काही दलाल नेमले आहेत.हे दलाल ठराविक तारखेला हप्ता गोळा करून अव्वल कारकूनाच्या हाती देत आहेत, तेथून वरिष्ठ अधिकाऱ्याना ठरलेला हप्ता जात आहे. आलेला हप्ता तहसील कार्यालयातच मोजला जात आहे.
पाहा व्हिडिओ ...
चौकशीची मागणी
उस्मानाबादच्या तहसील कार्यालयातील पुरवठा कर्मचारी राजरोस पैसे घेत असताना तहसीलदार गणेश माळी मूग गिळून गप्प आहेत. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे.
हेही वाचा