'शिव' वगळल्यावर 'राम' कसा राहणार ?

मेडसिंगा येथील पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
 
s

उस्मानाबाद  - शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असताना 'महा शिव विकास आघाडी' हे नाव गटबंधनाला देण्याचे ठरले होते. त्यात बदल करत 'शिव' वगळण्यात आल्यामुळे आता त्यांच्यात 'राम' कसा राहील ? असा सवाल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मेडसिंगा येथील शिवसेनेचे सोसायटीचे चेअरमन, शिवसेना शाखा प्रमुख, शाखा कार्याध्यक्ष, युवा सेना शाखा प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह युवकांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात उपस्थित केला.

जे 'शिव' हे नावच वगळतात त्यांच्याकडून आपण न्याय मिळण्याची अपेक्षा काय ठेवायची! ज्यांना 'शिव' या शब्दाची अडचण वाटते असे लोक मराठा आरक्षण मिळू देतील का? ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करतील का? तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी धनगर समाजास उपलब्ध करून दिलेल्या सुविधा पुढे चालू ठेवतील का? अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुढे मदत करतील का? निवडणुकीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रु. २५००० ते ५०००० मदत द्या म्हणणारे आज मुख्यमंत्री आहेत, ते खरंच शेतकऱ्यांना मदत करत आहेत का? शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत ७/१२ कोरा करू, चिंतामुक्त शेतकरी करू असे म्हणणारे प्रत्यक्षात कृतीतून हे दाखवतायेत का? वीज बिल वसुली पोटी पिकास पाणी आवश्यक असतांना वीज तोडणारे सरकार खरेच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे का? असे अनेक प्रश्न गेली दोन वर्ष अनुत्तरित आहेत. आज राज्यातील शेतकरी महाविकास आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे जास्त चिंताग्रस्त झाला आहे. असे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे, टेकनिकल टेक्सटाईल पार्क यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले अनेक प्रकल्प शिवसेनाने प्रलंबित ठेवले आहेत. याउलट देशातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहचविण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी वेगवेगळ्या स्वरूपात केला आहे. कोरोना काळात आत्मनिर्भर भारत, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, मोफत रेशन या सारख्या अनेक जणकल्याणकारी योजना त्यांनी राबविल्या आहेत. शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचत आहे. या योजनांचा लाभ शेवटच्या अडचणीत असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याची जिम्मेदारी ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे असे मत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे निर्माण झालेली नकारात्मकता व भारतीय जनता पार्टीची विकासात्मक भूमिका स्वीकारून मेडसिंग येथील अनेक जेष्ठ शिवसैनिक, पदाधिकारी व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. यात प्रामुख्याने शिवसेना पक्षाचे विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री.तुकाराम रणदिवे, शिवसेना शाखा प्रमुख श्री.जरिकांत आगळे, शाखा कार्याध्यक्ष श्री.विकास गोरे, युवा सेना शाखा प्रमुख श्री.दिनेश शित्रे,  विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.ज्ञानेंद्र पडवळ, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री.गोरोबा पकाले, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रमोद रोहिले, श्री.दादासाहेब शिंगटे, श्री.किशोर वसंत पाटील, श्री.शरद आगळे, श्री.दादासाहेब पडवळ, श्री.सहदेव शित्रे यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा समावेश आहे . यावेळी आमदार स्थानिक विकास निधीतून मेडसिंगा, तालुका उस्मानाबाद येथे खंडोबा मंदिरासमोरील सभामंडपाच्या कामाचे (रुपये ७ लक्ष) गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष  राजसिंह राजेनिंबाळकर,  युवराज ढोबळे, पांडूअण्णा पवार, नवनाथ कांबळे, यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थिती होते .

From around the web