उस्मानाबाद जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना  निवडून द्या.... 

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील 
 
d

उस्मानाबाद  -  उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीत  महाविकास आघाडीचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर उर्वरित १० जागेसाठी मतदान होणार आहे. या बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मतदारांनी या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन महा विकास आघाडीचे नेते तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी केले.

येथील पुष्पक पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, माजी आ. राहुल मोटे, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुनील चव्हाण, मधुकर मोटे, विक्रम सावंत, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, गौतम लटके आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ५ जागा बिनविरोध निघालेल्या आहेत. हे अतिशय महत्त्वाचे असून राहिलेल्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी सर्वांनी मदत व सहकार्य करावे. तसेच या बँकेवर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून भविष्यामध्ये बँकेला चांगले वैभव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ते करण्याची सामुदायिक जबाबदारी असून आम्ही चांगल्या रीतीने पूर्ण पार पाडू असे आश्वासन त्यांनी दिले. 

विशेष म्हणजे या बँकेवर अनेक लोकांच्या अपेक्षा असून त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत मतदारांचे सहकार्य आम्हाला निश्‍चितपणे मिळणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे उमेदवार निश्चितपणाने निवडून येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला. तर तेरणा, नृसिंह व तुळजाभवानी कारखान्यास दिलेल्या कर्जास शासनाने दिलेल्या थक हमीची रक्कम देण्याचा देवरा समितीच्या शिफारशींनुसार राज्य सरकारने निर्णय घेतला असून या निर्णयामुळे  ७० ते ११५ कोटी रुपयांपर्यंतची मदत येत्या मार्च एप्रिलपर्यंत मिळणार आहे. त्यामुळे बँकेला येत्या दोन-तीन वर्षांमध्ये ऊर्जितावस्था येईल असे सुरेश बिराजदार यांनी सांगितले. 

देशातील सगळ्यात मोठ्या पक्षाने निवडणूक लावली

या बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मात्र देशातील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या मंडळींनी ही निवडणूक बिनविरोध काढण्यास आडकाठी केली असल्याचा टोला खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता लगावला. तसेच या बँकेला निश्चितपणे गतवैभव प्राप्त करून देण्याच्यादृष्टीने आम्ही काळात प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

From around the web