गाळपा अभावी शिल्लक उसाला प्रती एकर रु ८० हजार तर जळालेल्या उसाला प्रती एकर रु ४० हजार द्या

 - आ. राणाजगजितसिंह पाटील यांची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
 
gg

उस्मानाबाद    - जिल्ह्यातील वाढलेले उसाचे क्षेत्र निदर्शनास आणून संपूर्ण गाळपासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याची मागणी शासन व प्रशासनाकडे वारंवार करून देखील गाळप आभावी ऊस शिल्लक राहण्याची भीती असून शिल्लक उसाला प्रति एकर रुपये ८० हजार तर जळालेल्या ऊसाला प्रति एकर रुपये ४० हजार अनुदान शेतकऱ्यांना देण्यासह किमान पुढील वर्षी तरी अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी या गळीत हंगामातील ऊसतोड व गाळप प्रक्रियेतील उणीवांचा बारकाईने अभ्यास करून पुढील हंगामात सुयोग्य नियोजन करावे अशी मागणी आ.  राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

राज्यात आज मितीला मोठ्या प्रमाणात गाळपा आभावी ऊस शिल्लक आहे. या उभ्या उसाच्या चिंतेने शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उभ्या उसाची परिस्थिती फेब्रुवारी महिन्यात लक्षात आल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद याना सूचित करून गावनिहाय उभ्या उसाचा आढावा घेतला व प्राप्त अहवालानुसार अंदाजे २५,००० हे. क्षेत्रावर ऊस शिल्लक असल्याची माहिती साखर आयुक्त व जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना देण्यात आली होती. त्या अनुषंगाने विभागीय सह-आयुक्त, सोलापूर व जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी कारखानदारांच्या बैठका घेतल्या होत्या. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना गुळ पावडर कारखानदारांचा आढावा घेऊन योग्य सूचना देण्याबाबतही सांगितले होते.

असे असून देखील अनेक गावां मध्ये अजूनही बराचसा ऊस शिल्लक आहे. संपूर्ण उसाचे गाळप करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी उपाययोजना राबविणे अपेक्षित आहे. मात्र तरीही उस शिल्लक राहिल्यास शेतकऱ्यांना प्रति एकर किमान रू. ८०००० अनुदान स्वरूपात द्या तसेच हंगाम लांबल्यामुळे उस जळाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना किमान प्रती एकर रु. ४०००० मदत देण्यासह या गळीत हंगामातील ऊसतोड व गाळप प्रक्रियेतील उणिवांचा अभ्यास करून पुढील हंगामात सुयोग्य नियोजन करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आ.  राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

From around the web