मुंबईला सोडा अन्यथा आत्महत्या करू...
Sat, 4 Apr 2020
उस्मानाबादहून मुंबईला निघालेल्या १५ जणांची धमकी
सध्या मुंबईच्या अंधेरीत राहात असलेले उस्मानाबाद जिल्ह्यातील एक कुटुंब जनता कर्फ्युच्या रात्री एका पाहुण्याच्या अंत्यविधीला हे कुटुंब उस्मानाबाद जिल्ह्यात गेलं होतं. मात्र तातडीने महाराष्ट्र लॉकडाऊन आणि नंतर थेट भारत लॉकडाऊन करण्याचे आदेश निघाले. त्यामुळं या कुटुंबाच्या हातावर शिक्के मारून होम क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र होम क्वॉरंटाईन पूर्ण होण्याआधी तिथंच थांबण्याचे आदेश असताना ही हे कुटुंब मुंबईच्या दिशेने रवाना झालं.
उस्मानाबादहुन मुंबईला चालक आणि 15 लोकांचं कुटुंब बुधवारी निघालं होतं, तेव्हा वडगाव मावळ पोलिसांच्या नाकाबंदीत त्यांची गाडी अडवण्यात आली. तेव्हा सर्वांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचे शिक्के असल्याचं समोर आलं होतं.
त्यानंतर गाडी ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर या 16 जणांना भेगडे लॉन्स येथे प्रशासनाने राहण्याची सोय केली. यात काही लहान आणि इतर मोठ्या व्यक्ती आहेत. त्यांनी वेळोवेळी तिथं नको त्या मागण्या करून प्रशासनाशी वाद घालायला सुरुवात केली आहे. मागण्या पूर्ण होणार नसतील तर आम्हाला मुंबईला जाऊ द्या, अन्यथा आम्ही आत्महत्या करू अशी धमकी ही ते देतायेत. ते पुन्हा निघून जायची शक्यता असल्याने पोलिसांनी तिथं खडा पहारा लावला आहे.