पालकमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा... आला वारा - गेला वारा ... 

 
पालकमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा... आला वारा - गेला वारा ...

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडवला आहे.  जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६००८ झाली आहे. गेल्या सहा दिवसात ९३ जणांचा बळी गेला असून, दररोज किमान १० ते १५ जणांचा मृत्यू होत आहे. दरररोज मृत्यूचे आकडे पाहून लोक भयभीत होत  आहेत.  ग्रामीण भागात लोक गाव सोडून शेताकडे राहण्यास जात आहेत. 

अश्या बिकट  परिस्थितीमध्ये लोकांना धीर देण्याची  गरज आहे. पालकमंत्री शंकरराव गडाख २६ जानेवारीनंतर उस्मानाबादला आले नव्हते, उस्मानाबाद लाइव्हने त्याचा समाचार घेतल्यानंतर ते  अखेर उस्मानाबादला सोमवारी आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भात बैठक झाली. दर आठवड्याला अशी बैठक अपेक्षित आहे. 

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाचा ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर कसा सुरु होईल, रेमडेसिवीर इंजेक्शन कसे उपलब्ध होतील, याचे नियोजन झाले पाहिजे. नगर मध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन आता भागणार नाही.त्यासाठी  प्रत्यक्ष उस्मानाबादला आले पाहिजे. सरकारी यंत्रणा ही  बश्या बैलासारखी आहे, त्याला उठवून हकलावे लागते. 

राज्यात  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे आघाडी सरकार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. जिल्ह्यात एक खासदार आणि तीन आमदार शिवसेनेचे आहे. मग अडचण नेमकी कुठे आहे ? 

पालकमंत्री गडाख यांनीऑक्सिजनचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखीन चार प्लांट उभे करणार असल्याचे सांगितले. मात्र मागील वर्षीचा प्लांट आणखी सुरु झाला नाही तर प्रस्तावित प्लांट कधी सुरु होणार ? हे एक कोडेच आहे. 

तहान लागल्यावर विहीर खोदण्याची प्रशासनाची जुनी सवय आहे. गेल्या एक वर्षापासून कोरोनाचा उद्रेक आहे. दुसरी लाट येणार हे माहित असताना, ऑक्सिजन प्लांट आजपर्यंत सुरु का झाला, याची उत्तरे कुणाकडेही नाहीत. 

पालकमंत्री शंकरराव गडाख यांना 'उस्मानाबाद लाइव्ह'चे आठ प्रश्न ...


१ ) नवीन ऑक्सिजन प्लांट किती तारखेला चालू होईल ?

२)  काल ( सोमवारी ) पालकमंत्री आणखी चार ऑक्सिजन प्लांट चालू करू असं  म्हणाले..  मागच्या वर्षीचे  प्लांट अजून चालू नाही मग हे नवीन चार कधी पर्यंत कार्यान्वित होतील याची काही डेड लाईन ठेवली आहे का ?

३) या प्लांट मधून फक्त 10 टक्के  ऑक्सिजन ची गरज भागेल मग उर्वरीत 90 टक्के  ऑक्सिजनसाठी आणि सध्या रुग्णवाढीचा दर पाहता काय उपाययोजना आहेत ?

४)  उस्मानाबाद  शहरात 160 व्हेंटिलेटर बेड आहेत सध्या ची रुग्ण वाढीचा दर पाहता नवीन व्हेंटिलेटर मागवले आहेत का,किती मागवले आणी ते नेमके किती दिवसात कार्यान्वित होतील ? 

५) शहरात सध्या किती रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत,सध्याची गरज आणि  वाढणारी रुग्ण संख्या पाहता रोज किती इंजेक्शन आपण मागवणार आहात याचा काही डेटा आहे का  ?

६) खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन संपण्याच्या घटना घडल्या आहेत,त्या घडू नये म्हणून काय उपाययोजना केल्या आहेत किंवा करणार आहात ?

७) सध्या सगळे हॉस्पिटल मधील बेड फुल आहेत, मग एखादं नवीन कोविड सेन्टर,ज्यात व्हेंटिलेटर नाही निदान ऑक्सिजन बेड असतील असे कधी चालू करणार आहात आणि किती बेड  हे चालू करणार आहात ?

८) उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो काळा  बाजार सुरु आहे, त्याला पायबंद घालण्यासाठी काही पथक नियुक्त केले आहेत का ? 

From around the web