दूरगामी परिणाम करणारा सर्वंकष व संवेदनशील अर्थसंकल्प - आ, राणा जगजितसिंह पाटील 

नविन वर्ष नव्या घोषणा, मागच्या घोषणेचा विसर - आ. कैलास पाटील
 
sd
शेतकरी व बेरोजगार तरुणासाठी दिलासादायक अर्थसंकल्प  - ॲड रेवण भोसले

उस्मानाबाद - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. तब्बल दीड तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं. या  अर्थसंकल्पाबद्दल भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, शिवसेनेचे आमदार कैलास पाटील तसेच जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

दूरगामी परिणाम करणारा सर्वंकष व संवेदनशील अर्थसंकल्प - आ, राणा जगजितसिंह पाटील 

rana

कोविड महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक व आरोग्य संबंधी परिस्थितीचा सर्वंकष विचार करून दूरगामी विकास साधण्यासाठी अर्थमंत्री महोदयांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अभूतपूर्व निर्णय घेत विक्रमी आर्थिक तरतुदी केल्या आहेत.

भांडवली गुंतवणूकीत रु. ५ कोटी वरून रू. ७.५ कोटी अशी ३०% विक्रमी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेच्या माध्यमातून देखील मोठे आर्थिक बळकटीकरण होणार आहे. आर्थिक वृद्धी व शाश्‍वत विकासासाठी महत्त्वाची आणि आमूलाग्र बदल करणारी ही योजना आहे. पुढील आर्थिक वर्षात २५,००० किमीचे राष्ट्रीय महामार्ग बनविण्याचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी रू.४८,००० कोटी रुपयांची तरतूद असून, ‘हर घर नल से जल’ या योजनेसाठी रू.६०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून सर्वसामान्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन येणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारला ० % टक्के व्याजाने देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा १० पटीने वाढवून एक लाख कोटी केली आहे.

रु. ५ लाख कोटींची  ECLGS (इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम) योजना ही कोविडमुळे अडचणीत आलेल्या ‘लोकांशी संपर्क असलेल्या व्यवसायांना' उभारी देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑनलाईन शिक्षणाची वाढलेली गरज लक्षात घेत २०० नवीन शैक्षणिक टेलिव्हिजन चॅनल सुरू करण्यात येणार आहेत. कोविड मुळे उद्भवलेल्या मानसिक आजारावरील उपचारासाठी 'राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रम' राबविण्यात येणार आहे.

शेतकरी आणि कष्टकरी केंद्रित असा हा अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी यात अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक व नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचे महत्व लक्षात घेत मोठा भर देण्यात आला असून ड्रोनचा व्यापक वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

सहकार क्षेत्रासाठी क्रांतिकारी विचार करून प्राप्तिकर १८.५ टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आला आहे. सरचार्ज १२ वरून ७ टक्के करण्यात आला आहे. यामुळे सहकार क्षेत्राला सुद्धा विकासाची नवी गती प्राप्त होणार आहे.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व रोजगार निर्मिती साठी केंद्र सरकारने अभूतपूर्व अशा  मोठ्या योजना व विक्रमी निधी घोषित केला असून, ठाकरे सरकारने एकंदर संपूर्ण राज्यासाठी व विशेषतः उस्मानाबाद साठी याचा योग्य उपयोग करून घ्यावा ही अपेक्षा आहे.

नविन वर्ष नव्या घोषणा, मागच्या घोषणेचा विसर - आ. कैलास पाटील

dada1

 शेतकर्‍यांच्या बाबतीत केंद्र सरकार अजिबात गंभीर नसल्याचे दिसुन येत आहे. गेल्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली दीडपट हमीभाव ही घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना दिलेले गाजर होते हे सिध्द झाले आहे.या अर्थसंकल्पात यावर एक चकार शब्द देखील अर्थमंत्र्यांनी काढला नाही. यावरुनच तुम्ही शेतकर्‍यांच्याप्रती किती गंभीर आहात हे लक्षात येत आहे. महागाई वाढलेली असताना त्यात दिलासा देण्याची आशा सामान्याना होती पण तिथेही भ्रमनिरास केल्याने हे सरकार फक्त घोषणा करते प्रत्यक्षात त्याच पुढे काहीच होत नाही. फसव्या घोषणा हेच या सरकारच मोठं यश आहे.


शेतकरी व बेरोजगार तरुणासाठी दिलासादायक अर्थसंकल्प  - ॲड रेवण भोसले

Revan Bhosle

उस्मानाबाद दि. 1: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या इतिहासात शेतीसाठी सर्वाधिक दोन लाख सत्तर हजार कोटीची तरतूद असलेला तसेच कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या बेरोजगारीने देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरले असल्यामुळे आत्मनिर्भर भारत अंतर्गत 16 लाख नोकऱ्या तर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्या देण्याचा संकल्प केला आहे .सहकार व खाजगी संस्था साठी आता वेगळा नियम नसून 15 टक्के कर राहणार आहे. 

हे अंदाजपत्रक 130 कोटी भारतीयांचे जीवनमान अधिक उंचावणारे आहे. तसेच यामध्ये महामार्ग, रेल्वे, वीज, आरोग्य, शिक्षण व शेतीशी संबंधित महत्वपूर्ण पायाभूत सुविधावर अधिक भर देण्यात आला आहे. शेतकरी, महिला व युवकाकडे अधिक लक्ष देणारे अंदाजपत्रकात पीएम  गती शक्ती योजनेच्या माध्यमातून विकासावर अधिक भर देण्यात आला आहे .सर्व सामान्य माणूस ,शेतकरी- कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने मांडला असल्याची प्रतिक्रिया जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी दिली आहे.

From around the web