महापुरामुळे जनतेत आक्रोश आणि रोष

उस्मानाबाद - मुसळधार पावसामुळे तेरणा आणि मांजरा नदी कोपल्यामुळे उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यातील १२ पेक्षा अधिक गावात पाणी शिरले. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले असता त्यांचा ताफा ठिकठिकाणी अडवण्यात आला.
पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या दौऱ्याची सुरुवात दाऊतपूर येथून झाली. यावेळी लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर पालकमंत्री इर्ला येथे आले असता काही महिलांनी त्यांचा ताफा अडवून अनेक तक्रारी केल्या. तेर येथे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी पालकमंत्र्याचा ताफा अडवून तेरच्या समस्या मांडल्या.
रामवाडीचे शेतकरी संतप्त
रामवाडीला पुराचा मोठा फटका बसला आहे. पालकमंत्री रामवाडीची पाहणी न करता पुढे जात असल्याचे लक्षात येताच शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी काही काळ ताफा अडवून धरला. पालकमंत्री गडाख यांनी पुन्हा नंतर येतो म्हणून निघून गेल्याने शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा माध्यमांसमोर मांडल्या.