अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्तांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.#MahaCabinetDecision
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 13, 2021
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात आलेल्या पूरामुळे तसंच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचं नुकसान झालं. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर केल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं.
या निर्णयाबाबत माहिती देताना राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले, जिरायतीसाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये तर बागायतीसाठी प्रतिहेक्टर १५ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे जिरायतीसाठी केंद्राकडून ६,८०० रुपयांच्या मदतीचे निकष असले तरी राज्यानं यासाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
ही मदत खालीलप्रमाणे –
- जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
- बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
- बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर
- ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.