अतिवृष्टीमुळे बांधित झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

  - पालकमंत्री शंकरराव गडाख
 
a

उस्मानाबाद -  जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. तेंव्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. एकही अतिवृष्टग्रस्त किंवा पावसाने ओढ दिल्याने बांधित झालेला शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले.

जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथे अतिवृष्टीने बांधित झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 14 ऑगस्ट रोजी मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो. तेंव्हा दोन-तीन आठवडे पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची पीके सुकत होती, त्याची पाहणी करुन मी तेंव्हा पीक विमा कंपनी आणि महसूल प्रशासन यांना संयुक्त पीक पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. ते कामही सुरु झाले होते. त्यानंतर काही दिवसातच जिल्हयात पावसाचे पुन्हा आगमन झाले. जिल्हयातील काही भागात अतिवृष्टी होऊन पुन्हा पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर अतिवृष्ठीग्रस्त पिकांचीही पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. या पंचनाम्याचे काम अंतीम टप्यात आहे. केवळ आपल्याच जिल्हयात नव्हे तर मराठवाडयातील बहुतेक जिल्हयात अतिवृष्‍टीने पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबईत याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेऊन राज्यशासन शेतकऱ्यांना मदत करेल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार शेतकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पीक पाहणीस उशिरा सुरुवात झाली असली तरी एकही शेतकरी या पाहणीतून सुटणार नाही.उशिरा पीक पाहणी सुरु झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करुन पारगाव येथील मांजरा नदीच्या पात्रा शेजारच्या शेतीतील पिकांचे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन श्री.गडाख यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतल्या. सोलापूर-धुळे महामार्गाजवळच्या मांजरा नदीच्या पात्राशेजारच्या शेतीत पुराचे पाणी येत असेल तर त्याला थांबविण्यासाठी येथून जवळच असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु अनेक शेतकरी अशा कामास विरोध करतात. त्यांना आपली शेती जाण्याची भिती असते. तेंव्हा या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्ती, नदीचे खोलीकरण आणि संबंधित इतर कामे करण्याची गरज आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी लेखी हमी देऊन काम करण्याची मागणी केल्यास या बंधाऱ्यांचे काम केले जाईल. त्या कामास निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. पण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या कामास सहकार्य करावे, शासन आपल्या पाठीशी आहे, असे आश्वासनही पालकमंत्री श्री.गडाख यांनी शेतकऱ्यांना दिले.

मागच्या सरकारच्या काळातील जलसंधारणाच्या कामात अनियमितता झाल्याचा अक्षेप कॉगने नोंदविला आहे. कॉगने दोन हजारांवर कामांची तपासणी केली असता त्यापैकी नऊशे ते एक हजार कामात अनियमितता आढळून आली आहे.गेल्या सरकारने राज्यात जलसंधारणाची एक लाख कामे केली होती.या कामांबाबत राज्यातील शेतक-यांकडून अजूनही मोठया प्रमाणावर तक्रारी येत आहेत. या तक्रारींची चौकशी जिल्हाधिकारी, एस.आय.टी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे,अशी माहितीही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एक प्रश्नाच्या उत्तरात दिली.

ई-पीक पाहणी हा नवा प्रयोग आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शेतक-यांना जलद गतीने मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.यात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करता येतील.पण शेतकऱ्यांनी हे नवे तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्री यांचे खाजगी सचिन बपासाहेब थोरात,कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ,वाशीचे तहसीलदार श्री.जाधव,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

From around the web