मंत्री मंडळाच्या बैठकीत मदतीचा निर्णय न झाल्यास देता की, जाता आंदोलन

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा इशारा 
 
s

उस्मानाबाद - जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ४ लाख ५५ हजार ४०६ शेतकऱ्यांच्या ३ लाख १२ हजार ४०६.५८ हेक्टर  पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र अद्यापपर्यंत देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद केलेली नाही किंवा मदतीची घोषणा देखील केलेली नाही. उद्या दि. १३ ऑक्टोबर रोजी मंत्री मंडळाची तिसरी बैठक होणार आहे. 

या बैठकीत किमान शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निर्णय घेऊन योग्य निधीची तरतुद करावी, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. दरम्यान, जर या बैठकीत मदतीबाबत निर्णय न झाल्यास व निधीची तरतूद करण्यास टाळाटाळ केली तर उद्या दि. १४ ऑक्टोबरपासून राज्य सरकार विरोधात भाजपाच्यावतीने देता की, जाता हे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.


शहरातील प्रतिष्ठाण भवन भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा समन्वय नेताजी पाटील, सरचिटणीस नितीन भोसले, निहाल काझी, विजय दंडनाईक, अभय इंगळे आदी उपस्थित होते. 

आमदार  पाटील म्हणाले की, दि. ९ जुलै रोजी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी व पाडोळी या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या अनुषंगाने अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानीची मदत दिलेली नाही. त्यानंतर २५ दिवसांचा पावसाचा खंड पडला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अग्रीम २५ टक्के पीक विमा रक्कम देण्याचे आदेश काढले. त्यालाही २५ दिवसांचा कालावधी लोटला असून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एक रुपया देखील देण्यात आलेला नाही. 

 सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेत जमिनीचे, जनावरे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीची घोषणा केलेली नाही. तर खरीप २०२० बाबतीत देखील न्यायालयात सुनावणी दरम्यान राज्य सरकारने आपले म्हणणे दाखल केलेले नाही. यावरुन ठाकरे सरकारचा बेजबाबदार व असंवेदनशीलपणा दिसून येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. तत्कालीन फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीपट्टीने मदत केली होती. मात्र ठाकरे  सरकार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कोणतीची भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. तर उद्या होणाऱ्या बैठकीत नुकसानग्रस्त भागातील अल्पभुधारक शेतकऱ्यांबरोबर बहुभुधारक शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.


शिवसेनेच्या मंत्र्यांची वाट पाहतोय !

जिल्हयातील शेतकरी अडचणीत व संकटात सापडलेले असतानाही शिवसेनेचे एकही मंत्री पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात फिरकले नाहीत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचे, कृर्षीमंत्री शिवसेनेचे व जिल्ह्याचे पालकमंत्री देखील शिवसेनेचे आहेत. शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांना जिल्ह्यात आम्ही फिरकू देणार नसून आम्ही त्यांच्या येण्याची वाट पाहतोय, असा गर्भीत इशारा त्यांनी दिला.

From around the web