सततच्या पावसाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ई-प्रामाणिकरणाची प्रक्रिया लगेच करावी

- आ. राणाजगजितसिंह पाटील
 
rana

धाराशिव  - सततच्या पावसाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई - प्रामाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. ई – प्रामाणीकरण होताच अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

सततच्या पावसासाठी महायुती सरकारने रु.१५०० कोटी उपलब्ध करून दिले असून धाराशिव जिल्ह्यासाठी यातील रु.१३७ कोटी मंजूर केले आहेत. आजवर शेतकऱ्यांना केवळ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पोटीच राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी निकषाप्रमाणे मदत दिली जात होती, मात्र महायुती सरकारने यापुढे जाऊन सततच्या पावसाने झालेल्या नुकसानी पोटी देखील मदत दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संकेतस्थळावर अपलोड केल्या जात असून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर या याद्या गावोगावी डकविण्यात येणार आहेत. 

सदरील यादीमध्ये नावाची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांनी ई-प्रामाणीकरण (ई-केवायसी) करून घेणे अपेक्षित असून त्यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

तहसीलदार यांच्याकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या आजवर अपलोड केलेल्या याद्या प्रामाणीत करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने आज 47117 शेतकऱ्यांच्या याद्या मंजूर करण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ई – प्रामाणीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. खरीप पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना शासनाने पैसे उपलब्ध करूनही शेतकऱ्यांना वितरित करण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

प्रसिध्द करण्यात आलेल्या याद्यांमध्ये शेतकऱ्यांनी नावाची, बॅंक खाते व आधार कार्ड क्रमांकाची खात्री करून तात्काळ ई -  प्रामाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. ई – प्रामाणीकरण होताच अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

From around the web