उस्मानाबाद जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
शेतकरी शेतमजूर संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Thu, 30 Sep 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश शेतकरी शेतमजूर संघटनेने केली आहे.
- जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
- सन २०२०-२१ या चालू वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावा
- छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मापी योजने अंतर्गत राहिलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज माफी मिळावी
- डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात यावा यासाठी बँकांना आदेश देण्यात यावेत
- केंद्र शासनाने कृषी कायदे ताबडतोब मागे घ्यावेत व साखर कारखान्याकडे थकीत असलेली रक्कम शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावी
या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मंजूर करून ताबडतोब कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश शेतकरी शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष कोंडाप्पा कोरे, कार्याध्यक्ष प्रा. मारुती कारकर, महादेव कसबे, रामचंद्र जमाले, दिगंबर करंजकर, राजेंद्र कसबे व माधव क्षिरसागर यांच्या सह्या आहेत.