प्रोत्साहन अनुदान योजनेमुळे बळीराजा सुखावला !

शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन - आ. राणाजगजितसिंह पाटील
 
s

उस्मानाबाद  - गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देताना पिचलेल्या बळीराजाला ५०००० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेऊन राज्यातील १४ लाख शेतकरी कुटुंबाना दिलासा दिल्याबद्दल भाजप आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत. पुरवणी मागण्यांची वाट न बघता उपलब्ध निधीमधून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत व ही प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. केवळ कागदी घोषणा करून दोन वर्षे शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या ठाकरे सरकारमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यास या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या क्रांतिकारक निर्णयामुळे १४ लाख शेतकऱ्यांच्या रुपये ६००० कोटींच्या कर्जाचा बोजा हलका होणार असून थेट ऑनलाईन पद्धतीने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यास मिळणार असल्याने मदतीसाठी हेलपाटे न घालता शेतकऱ्याची प्रतिष्ठा जपण्याची सरकारची भावना महत्वाची आहे, असे आ. पाटील यांनी म्हटले आहे. २०१९ मध्ये अतिवृष्टी, महापुर व नैसर्गिक आपत्तींमुळे अतोनात नुकसान झालेला शेतकरी प्रत्यक्षात अडीच वर्षे मदतीपासून वंचित राहिला होता. ठाकरे सरकारने केवळ घोषणांचे गाजर दाखवून शेतकऱ्याची उपेक्षा केली. या आपत्तींनंतरच्या कर्जमाफीस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील भाजप-सेना युती सरकारच्या नव्या प्रोत्साहनपर योजनेत समाविष्ट केल्याबद्दल आमदार  राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

ठाकरे सरकारच्या काळात राज्याच्या थंडावलेल्या प्रगतीला शिंदे-फडणवीस सरकारमुळे वेग येत असल्याचा दावाही त्यांनी केला. शेतकऱ्याची समस्यामुक्ती, ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास यांचा योजनापूर्वक समतोल साधणारी युती सरकारची वाटचाल महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देईल, असा विश्वासही आ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.

From around the web