खरीप हंगाम 2022 पीकस्पर्धेत शेतक-यांनी सहभागी होण्याचे आवाहन

 
sheti

उस्मानाबाद -  रब्बी हंगाम 2021 मध्ये पीकस्पर्धेसाठी राज्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2022 साठीही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग आणि उडीद पिकांसाठी 31 जुलैपूर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करुन पीकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी महेश तीर्थकर  यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात आणि उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. 

पीकस्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल.खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके - भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तुर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण 11 पिके आहेत.प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी दहा आणि आदिवासी गटासाठी पाच राहील .पीकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या शेतावर त्यापीकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील.

तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या  सर्वसाधारण गटासाठी पाच आणि आदिवासी गटासाठी चार राहील. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी प्रवेशशुल्क पीकनिहाय प्रत्येकी 300 रुपये आहे. मूग आणि  उडीद पीकासठी अर्ज दाखल करण्याची तारीख 31 जुलै आहे आणि भात, ज्वारी,बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे.

पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन,  7/12, 8अ चा उतारा आणि जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात द्यावे. पीकस्पर्धा विजेत्यांसाठी तालुका,जिल्हा,विभाग आणि राज्य पातळीवर सर्वसाधारण आणि आदिवासी गटात स्पर्धा घेण्यात येईल. तसेच विविध पातळीवरील विजेत्यांना पहिले,दुसरे आणि तिसरे बक्षीस देण्यात येतील.

स्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक , कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

From around the web