22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यत जनता कर्फ्यू

 

  कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी


22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यत जनता कर्फ्यू

उस्मानाबाद :- आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणूच्या आजारामुळे हाहाकार माजलेला आहे. आपल्या देशात व राज्यात या आजाराने बाधित झालेले रुग्ण मिळालेले आहेत. तरी या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठीकेंद्र व राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना प्रभावीपणे राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू ची हाक देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करून हा जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करावा असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकराव गडाख यांनी केले आहे.

       कोरोना च्या पार्श्वभूमीवर कुणीही घाबरू नये सर्वांनी धीर धरावा. कुठल्याही प्रकारचं संकट ज्यावेळेस राज्यावर आणि देशावर येतं, त्यावेळेस आपण सर्वांनी एकजुटीनं त्या संकटाचा सामना केला पाहिजे. ही आपली सगळ्यांची  सामुदायिक जबाबदारी आहे. या स्थितीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक राहावे असे पालकमंत्री गडाख यांनी सांगितले. कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या बाबतीत आपण दुसऱ्या टप्प्यात असून त्यापुढील टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत. रविवार दि 22 मार्च 2020 चा सकाळी 7 ते रात्री 9 पर्यत सर्वांनी घरीच थांबून जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी करा. घराबाहेर पडू नका, असे ही त्यांनी आवाहन केले.

     जिल्ह्यातील नागरिकांनी 31 मार्च 2020 पर्यंत घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळा.आपल्या परिवाराची काळजी घ्या,तोंडाला मास्क वापरा,खोकताना व  शिंकतांना तोंडाला रुमाल लावा,हात वारंवार स्वच्छ धुवा. कोरोनाविरुद्धातील लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्र शासन व प्रशासन आपल्या सर्व शक्तीनिशी सज्ज आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे,आरोग्य विभाग ,प्रशासन सर्व अधिकारी यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. गेल्या 15 दिवसांपासून आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी, राज्यावर आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत, असे पालकमंत्री गडाख यांनी सांगितले.

     संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचं संकट ओढवलेलं आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणं हा महत्त्वाचा उपाय आहे,आपल्या निवडक नातलगांच्या उपस्थितीत शुभविवाह समारंभ पार पाडा.व पुढील कार्यक्रम काही कालावधीसाठी पुढे ढकला. याशिवाय मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दशक्रियाविधी सुद्धा आटोपा. शक्य तेवढी गर्दी टाळण्याचा प्रयत्न सर्वांनी करा, स्वतःसोबत इतरांचंही आरोग्य जपावे, असे सांगून श्री गडाख पुढे म्हणाले की, आरोग्य विभाग व प्रशासन यांनी  केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन नागरिकांनी करावे. घरगुती, कार्यालयीन कामकाज  घरी थांबूनच पूर्ण करावे.

     सर्व अधिकारी व प्रशासन अतिशय जागरुकपणे सर्व परिस्थिती हाताळत आहेत. आपण सर्वांनी दक्ष राहून त्यांना सहकार्य करुया व कोरोनाला हद्दपार करूया! याकरिता आपल्या दक्षता पूर्ण सहकार्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा पालकमंत्री गडाख यांनी व्यक्त केली.

From around the web