मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी
Apr 5, 2020, 16:28 IST
औरंगाबाद - जगभर हाहाकार उडवणाऱ्या कोरोनाने मराठवाड्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सातारा परिसरातील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी करोनासदृश्य लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर या व्यक्तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आलं होतं. रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इतर शहरांपाठोपाठ औरंगाबद शहरात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं औरंगाबादमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बीड बायपास लगत असलेल्या सातारा परिसरातील व्यक्तीला करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानं तीन एप्रिलला सायंकाळी घाटीत दाखल करण्यात आलं होतं. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी मुंबईहून घरी परतली होती. त्यानंतर त्यांना अशी लक्षणं दिसून आली. दरम्यान घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी चाचणी करण्यात आली. रिपोर्टमध्ये करोना झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच रविवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला. सध्या औरंगाबाद शहरात तब्बल सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सद्यस्थितीस महाराष्ट्रात 690 जणांना करोनाची बाधा झालेली आहे. मुंबई – 29, पुणे – 17, पिंपरी-चिंचवड – 4, अहमदनगर – 3, औरंगाबाद – 2 असे 55 नवे करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण राज्यभरात आढळले आहेत.
Current count of #COVID19 patients in Maharashtra is 690. Till now, Mumbai 29, Pune 17, PCMC 04, Ahmednagar 3, Aurangabad 2, such 55 people have been newly identified as positive. Till date 56 people have been cured & discharged from hospital: Maharashtra Health Min Rajesh Tope pic.twitter.com/QNC9L0hdFX— ANI (@ANI) April 5, 2020