राज्यात उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 

राज्याचा कोरोना रिपोर्ट प्रसिद्ध 
 
corona

मुंबई - राज्यात एकीकडे नंदूरबार जिल्हा कोविड मुक्त झाला असताना, उस्मानाबाद जिल्ह्यात आजही सर्वाधिक रुग्ण आहेत तसेच मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६५  हजार ३८९  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६२ हजार ६५०  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४४५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७६४  झाली आहे.


मागील काळात झालेल्या ५३०  मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३२३ ,कोविड बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०१ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०६ जणांचा समावेश आहे.

•   कोविड साथरोग आटोक्यात आणण्यासाठी राज्याने केलेल्या आरोग्यविषयक उपाययोजना व नागरीकांचे सहकार्य याचा परिणाम म्हणून राज्यात दुसरी लाट नियंत्रणात आलेली आहे.

•   शुन्य रुग्ण - आज रोजी नंदूरबार जिल्हयात एकही कोविड सक्रिय रुग्ण नाही.

•   दहापेक्षा कमी रुग्ण -  राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे.

•   शंभरपेक्षा कमी रुग्ण -  राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे.

•   सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग.

•   राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) २.४४ टक्के इतका आहे.

•   राज्यात गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापि, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्हयांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर २.४४ टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.

 दिनांक १७ ऑगस्ट २०२१ अखेरची सक्रिय रुग्णसंख्या

o   आजपर्यंत बाधित झालेले एकूण रुग्ण -  ६४ लाख १ हजार २१३.

o   बरे झालेले रुग्ण -  ६२ लाख १ हजार १६८.

o   एकूण मृत्यू - १ लाख ३५ हजार २५५

o   सक्रीय रुग्ण संख्या - ६१ हजार ३०६.

o   रुग्ण बरे होण्याचा दर – ९६.८७ टक्के.

लसीकरण सद्यस्थिती :

•   राज्यात आजघडीला पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक डोस देण्यात आलेले आहेत.

•   राज्यातील ४५ वयोगटावरील जवळपास ५० टक्के नागरीकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. १८ ते ४४ वयोगटातील जवळपास २५ टक्के नागरिकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. राज्यातील एक कोटी तेहतीस लाख सात हजार नागरीकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या आहेत हा देशातील उच्चांक आहे.

•   तसेच दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यात एकाच दिवशी नऊ लाख चौसष्ट हजार नागरीकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. हा देखील महाराष्ट्रातील उच्चांक आहे.

•   राज्य नागरीकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आर्थिक गतीविधींना चालना देण्याचाही प्रयत्न करीत आहे. यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत.

•   नजीकच्या काळात येणारे विविध सण व उत्सव लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना जसे मास्कचा वापर, हाताची स्वच्छता व सुरक्षित शारिरीक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊन नागरीकांचा कोविड प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी नागरिकांनी भविष्यात देखील असेच सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

From around the web