वाधवान प्रकरणी काँग्रेसने राष्ट्रवादीचे वकीलपत्र घेऊन भाजपवर चिखलफेक करु नये
Apr 10, 2020, 22:34 IST
भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांचे काँग्रेसला चोख प्रत्युत्तर
वाधवान प्रकरणी काँग्रेसने राष्ट्रवादीचे वकीलपत्र घेऊन भाजपवर चिखलफेक करु नये , अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी काँग्रेसला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, सत्ताधारी पक्ष म्हणून काँग्रेसने वागणं-बोलणं शिकावं, असा सल्लाही भांडारी यांनी दिला.
भांडारी म्हणाले की , वाधवान प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीचे वकीलपत्र घेऊन भाजपवर चिखलफेक करु नये. उलट गेल्या सहा महिन्यांपासून महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे आणि अजित पवार करीत आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून अमिताभ गुप्ता सहा महिन्यांपासून या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे जर काँग्रेसला अजूनही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असून तेच सरकार चालवत असल्याचं वाटत असल्यास, त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही.
ते पुढे म्हणाले की , महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस ही सहभागी आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष या नात्याने काँग्रेस नेत्यांची वागणूक असली पाहिजे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी राज्यात फिरताना जबाबदारीने वागले आणि बोलले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.