शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना अटक आणि सुटका 

शिवसेना शहर उप प्रमुख प्रशांत ( बापू ) साळुंके मारहाण प्रकरण 
 
शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना अटक आणि सुटका

उस्मानाबाद - शिवसेना शहर उप प्रमुख प्रशांत ( बापू ) साळुंके यांना  राहत्या घरी जावून मारहाण केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी तब्बल १५ दिवसांनी शिवसेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना अटक करून न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्यांची जामिनावर  सुटका केली आहे. 

मुंबई उच्च  न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेली याचिका मागे घे म्हणून उस्मानाबादचे शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी, घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार शिवसेना शहर उप प्रमुख प्रशांत ( बापू ) साळुंके यांनी आनंदनगर पोलीस स्टेशन मध्ये १३ नोव्हेंबर रोजी केली होती. 

प्रशांत ( बापू ) साळुंके यांनी पोलीस स्टेशन मध्ये  दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की , मुंबई उच्च  न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपण उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नागरिक सुधार योजना अंर्तगत करण्यात आलेल्या कामात पाच कोटी रुपयाचा घोटाळा  झाल्याची याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असताना, उस्मानाबादचे शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, विजय उर्फ बाबा खडके, प्रदीप उर्फ पिंटू घोणे असे तिघेजण गुरुवार दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता बोलेरो गाडीतून आपल्या स्व. बाळासाहेब ठाकरे नगर ( काकडे प्लॉट ) मधील राहत्या घरी आले आणि तू हायकोर्टात दाखल  केलेली याचिका मागे घे म्हणू लागले. यावेळी  याचिका मागे  घेणार नाही म्हटल्यानंतर  नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी मानेला पकडून गालावर चापटा लगावल्या तसेच शिवीगाळ करून जीवे  मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी शिवसेना नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, विजय उर्फ बाबा खडके, प्रदीप उर्फ पिंटू घोणे यांच्या विरुद्ध भादंवि ४५२, ३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

अटक आणि सुटका 

शिवसेना शहर उप प्रमुख प्रशांत ( बापू ) साळुंके यांना  मारहाण केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना आज ( सोमवार ) सकाळी अटक केली होती. त्यानंतर सर्व  कागदपत्र रंगवून उस्मानाबादच्या न्यायालयात उभे केले. मुख्य न्याय  दंडाधिकारी यांनी त्यांची जामिनावर सुटका केली. 

काय आहे याचिका ? 

उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने सन  २०१९- २० मध्ये अण्णाभाऊ साठे दलित वस्ती नागरिक सुधार योजना अंर्तगत करण्यात आलेली कामे बोगस आहेत असे याचिकाकर्ते प्रशांत ( बापू ) साळुंके यांचे म्हणणे आहे. 

बनावट दस्तऐवज  तसेच बोगस निविदा प्रक्रिया करून पाच कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे.याबाबत मुंबई उच्च  न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल आहे, न्यायालयाने ही  याचिका दाखल करून घेतली असून, जिल्हाधिकाऱ्याना चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे  नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर शिवसेनेचे असून, याचिकाकर्ते प्रशांत ( बापू ) साळुंके शिवसेना शहर उप प्रमुख आहेत. त्यामुळे सामना रंगला आहे. 

From around the web