गुड न्यूज: उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या घटली
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही महिने हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाचा प्रभाव या आठवड्यात कमी हेाताना दिसत आहे. जिल्ह्यात सोमवारी ३० आणि मंगळवारी ४५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातून कोरोनाला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स तसेच स्वच्छतेची काळजी घेण्याची गरज आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रविवारच्या स्वॅबनुसार जिल्ह्यात ३० नवीन रुग्णांचे निदान झाले. रॅपीड अँटिजनच्या १५९ व प्रयोगशाळेतील १३२ तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी प्रयोगशाळेतील तपासणीनुसार २० व अँटिजन टेस्टनुसार ९ टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात ११, तुळजापूरमध्ये २, उमरगा २,कळंब ८, वाशीमध्ये ६, भूम तालुक्यात १ रुग्ण आढळून आला. लोहारा व परंडा तालुक्यात एकही नवीन रुग्णाची नेांद झाली नाही. जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाची जिल्ह्याच्या पोर्टलवर नोंद झाली आहे.
तसेच सोमवारच्या स्वॅबनुसार जिल्ह्यात ४५ नवीन रुग्णांचे निदान झाले. रॅपीड अँटिजनच्या ५२३ व प्रयोगशाळेतील ६६ तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी प्रयोगशाळेतील तपासणीनुसार २१ व अँटिजन टेस्टनुसार १७ टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात १७, तुळजापूरमध्ये १, उमरगा ४,कळंब ९, वाशीमध्ये ८, भूम तालुक्यात १ रुग्ण, परंडा ३, लोहारा २ रुग्ण आढळून आले आहेत. . जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या सात रुग्णाची जिल्ह्याच्या पोर्टलवर नोंद झाली आहे.
१३ हजार रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील ५२ कोरेाना रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात सध्या ७३३ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४२८१ झाली असली तरी १३ हजार ४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारच्या अहवालावरून जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृत्यू पावलेल्यांमध्ये बहुतांश रुग्ण ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे व अन्य व्याधींनी ग्रस्त होते. वेळेत उपचारासाठी दाखल न होणे व भीती हेही मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात येते.