दिल्लीच्या मरकज मध्ये उस्मानाबादेतून गेलेल्या तिघांचा शोध लागला !

 


दिल्लीच्या मरकज मध्ये उस्मानाबादेतून गेलेल्या तिघांचा शोध लागला !


उस्मानाबाद - दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील  मरकज मध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्ह्यातील जे तिघेजण गेले होते, त्यांचा शोध लागला असून, त्यांना होम  क्वारंटाईन  मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची प्राथमिक तपासणी केली असता, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे समजते. 


कोरोनाच्या संसर्गाचं केंद्र ठरलेल्या दिल्लीतील या धार्मिक स्थळी देश -विदेशातून 2137 जण सहभागी झाले होते. या ठिकाणी आलेल्या 2137 पैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. 

या धार्मिक स्थळी उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ  गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. पैकी एक जण मयत झाला आहे. चार  जण दिल्लीत अडकले असून तिघे जण उस्मानाबादेत परतले होते.  3 पैकी उस्मानाबाद शहरातील दोन आणि परंडा शहरांतून एकजण गेला होता, त्यांच्या संपर्कात कितीजण आले हे अजून स्पष्ट झालेले नाही. 


मात्र दिल्लीहुन उस्मानाबादेत परतलेल्या तिघांचा  शोध लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. या तिघांच्या हातावर शिक्के मारून त्यांना होम क्वारंटाईन  मध्ये ठेवण्यात आले आहे. 


दिल्लीच्या मरकज मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ जण सहभागी झाल्याचे कळल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली होती. नागरिकही घाबरून गेले होते. मात्र जे तिघेजण परतले आहेत, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सांगितले. 



भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या 2014 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 41 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 169 लोक ठीक झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितलं की, 24 तासांमध्ये 386 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तब्लिकी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमामुळे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

From around the web