जिल्हाधिकारी दिवेगावकर येताच तो गरीब शेतकरी अवाक् होवून  बघतच राहिला !

चटईवर बसून पिंपरीच्या शेतकऱ्याची केली आस्थेवाईकपणे चौकशी
 
जिल्हाधिकारी दिवेगावकर येताच तो गरीब शेतकरी अवाक् होवून  बघतच राहिला !

उस्मानाबाद - उस्मानाबादचे  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  हे संवेदनशील मनाचे असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. दिवेगावकर यांनी  पिंपरीचे शेतकरी शहाजी गायकवाड यांच्या शेतावर चटईवर बसून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी  केली तसेच त्यांची  कैफियत ऐकून घेऊन त्यांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 


जिल्हा निवडणूक प्रशासनाचे ईव्हीएम मशीन ठेवण्याचे मुख्य गोडाऊन पिंपरी  ता. उस्मानाबाद येथे आहे. या गोडावनच्या बाजूला व परिसरात शेती आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य गोडाउन येथे येऊन ई. व्ही. एम. मशीन ची पाहणी करण्यासाठी गेले  होते.

       येथील ईव्हीएम मशीन ची पाहणी करून झाल्यानंतर जिल्हाधिकारी दिवेगावकर गोडावन च्या बाहेर पडले. व आपल्या नियमित कामकाज त्यानुसार ते जिल्हाधिकारी कार्यालयात  जाणार परंतु त्यावेळेस गोडावनच्या  बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीकडे त्यांचे लक्ष गेले व त्यांनी उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे यांना सोबत  घेऊन शेतकरी शहाजी गायकवाड यांच्या शेतावर गेले.

        स्वतः जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व त्यांचे सहकारी आपल्या शेतावर आलेले पाहून शेतकरी शहाजी गायकवाड यांना विश्वास बसेना ! सध्या कोणत्याही प्रकारची पाहणी, पंचनामे वगैरे काही नसताना जिल्हा प्रशासन म्हणजे स्वतः जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी दिवेगावकर साहेब आपल्या शेतावर आल्याचे पाहून शहाजी गायकवाड हे आश्चर्यचकित झाले परंतु त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ही दिसून आला.

     शेतकरी गायकवाड यांनी जिल्हाधिकारी महोदय यांना बसण्यासाठी काही व्यवस्था करण्यासाठी इकडे तिकडे बघू लागले,  त्या वेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले की काही काळजी करू नका आम्ही खाली जमिनीवर बसतो. मी फक्त तुम्हाला येथे भेटण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी आलेलो आहे. कोणतेही आदरतिथ्याची आवश्यकता नाही. त्यावेळी शेतकरी गायकवाड यांनी जमिनीवर चटई अंथरली व जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी कोणताही संकोच न करता भारतीय बैठकीप्रमाणे मांडी घालून खाली बसले. व शेतकरी शहाजी गायकवाड यांची आस्थेवाईकपणे चौकशी करत म्हणाले की, कसे आहात? तुमचे आरोग्य कसे आहे. तसेच यावर्षीच्या खरीप हंगाम कसा झाला. अतिवृष्टीमुळे तुमच्या शेतीपिकांचे काही नुकसान झाले का?  नुकसान झाले असेल तर पंचनामे होऊन तुम्हाला काही मदत मिळाली का?

      यावेळी शेतकरी शहाजी गायकवाड यांनी या वर्षीचा खरीप हंगाम ते रब्बी पर्यंतचे सर्व कैफियत जिल्हाधिकारी महोदय यांच्यासमोर मांडली. खरीप हंगामात सोयाबीन काढून ठेवलेला होता, परंतु अतिवृष्टीने त्याच्यामध्ये पाणी जाऊन सर्व सोयाबीनचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाहणी करून पंचनामे झालेले आहेत. परंतु मदतीबाबत अद्यापही काही माहिती मिळालेली नाही. तसेच शासनाकडून इतर कोणत्याही प्रकारची मदत अद्याप पर्यंत मिळालेले नसल्याचे त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांना सांगितले.

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लगेच तहसीलदार गणेश माळी यांना भ्रमणध्वनीवरून कॉल करून शेतकरी शहाजी गायकवाड व श्रीमती त्रिशाला, देवशाला यांच्याविषयी माहिती दिली. तसेच यांना शासनाकडून कशा पद्धतीने मदत देता येईल याबाबतची माहिती सादर करावी व श्रीमती त्रिषाला यांना शासनाच्या कोणत्या योजनेतून लाभ देता येईल याबाबत माहिती घेऊन त्यांना लाभ देण्याबाबत सुचित करण्यात आले. तसेच शेतकरी गायकवाड यांच्या सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे कशा पद्धतीने झालेले आहेत व त्यांना झालेल्या नुकसानीची मदत त्वरित मिळाली पाहिजे. या बाबतची कार्यवाही करून अहवाल सादर करावा. तसेच या शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजनेतून कशा पद्धतीने अर्थसहाय्य व मदत करता येईल याचीही खातरजमा करण्याबाबत त्यांनी सुचित केले.

       जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी तात्काळ तहसीलदारांना दिलेल्या सुचनेनुसार शेतकऱ्यांना मदत मिळेल. यामुळे शेतकरी शहाजी गायकवाड व श्रीमती प्रशाला, देवशाला आनंदी झाले व आशा या आपत्तीच्या परिस्थितीत शासनाचा एक जिल्हा प्रशासन प्रमुख आपल्या शेतावर येऊन आपले आस्थेवाईकपणे चौकशी करून आपल्याला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

From around the web