उस्मानाबादेतील जात पंचायत बळी प्रकरणी आणखी सहा आरोपीना अटक 

 
sd

उस्मानाबाद : उस्मानाबादेतील जात पंचायतीच्या बळी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या १३ झाली आहे. 

जात पंचायतीचा भयानक त्रास सहन न झाल्याने शहरातील पारधी समाजातील  एका तरुण पती-पत्नीने विष प्राशन केले होते. यापैकी पतीची १४ व्या दिवशी प्राणज्योत मालवली होती.  संबंधित जात पंचायतीच्या तथाकथित पुढाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसह प्रेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला होता.   याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये  जवळपास ४०  लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पैकी आज सहा  जणांना  स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 

भा.दं.सं. कलम- 306, 354, 297, 268, 323, 504, 506, 34 सह महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासुन व्यक्तींचे संरक्षण अधिनियम कलम- 5, 6, 7 अंतर्गत आनंदनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्र. 275 / 2021 हा नोंदवला आहे. या गुन्ह्यातील 7 पाहिजे आरोपी हे यापुर्वीच अटक केले असून त्यांचे अन्य साथीदार 1) मोतीराम आगल्या काळे 2) सुभाष मोतीराम काळे 3) रवी लाला शिंदे 4) दादा लाला शिंदे 5) बाप्पा श्रीपती काळे 6) बापु मोतीराम काळे, सर्व रा. पळसप, ता. उस्मानाबाद यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दि. 11 ऑक्टोबर रोजी पळसप शिवारातून अटक केली असून उर्वरीत कार्यवाहिस्तव आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.  

काय आहे प्रकरण ? 

उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील व ह. मु. काका नगर उस्मानाबाद येथे राहणारे सोमनाथ छगन काळे यांचे त्यांच्या मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पारधी समाजातील काही पुढाऱ्यांनी जात पंचायत भरवून सोमनाथ यास २ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यापैकी २० हजार रुपये दंड देखील वसूल केले. मात्र उर्वरित १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे सतत तगादा लावला. विशेष म्हणजे जर तू पैसे देण्यास विलंब केलास तर तुझ्या वहिनीला नग्न करुन पंचासमक्ष तिच्यावर बलात्कार करण्यात येईल. तर तुझ्या डोक्यावर ५० किलो वजनाचा दगड ठेवण्यात येईल. उकळत्या तेलात तापविलेली कुऱ्हाड हातावर घ्यावी लागेल, आगी मोहोळाचा मध काढावे लागेल याबरोबरच मानवाची विष्टा देखील खावी लागेल. इतकेच नव्हे तर सोमनाथ यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

सतत दिल्या जाणाऱ्या व होत असलेल्या या जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ व त्यांची पत्नी अनिता यांनी दि.२२ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ त्यांना रूग्णालयात दाखल केले. यापैकी सोमनाथ यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले. या दरम्यान अनिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र दि.५ ऑक्टोबर रोजी सोमनाथ यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी जात पंचायतीचे म्होरके असलेल्या पुढारी यावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रेतासह नातेवाईकांनी आक्रोश केला होता. 

From around the web