उद्धवजी हेक्टरी ₹ २५००० देऊन ठाकरी बाणा दाखवा - आ.राणा पाटील

 
 उद्धवजी हेक्टरी ₹ २५००० देऊन ठाकरी बाणा दाखवा - आ.राणा पाटील


उस्मानाबाद - गेल्या दोन दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या काळात हातातोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.आपल्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्याने आता कोणतेही सोपस्कार पार न पाडता  गेल्यावर्षी औरंगाबाद  येथे आपण मागणी केल्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी तातडीने हेक्टरी ₹ २५००० देऊन आपला ठाकरी बाणा दाखवा असे आवाहन आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात गेली दोन दिवसांपासून अभूतपूर्व वादळी पाऊस पडत आहे.आज या अनुषंगाने आ.पाटील यांनी अनेक गावांत जाऊन पाहणी केली आहे.अभूतपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून काढणीला आलेले व काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले असून ऊस व तूर आदी नगदी पिकं आडवी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे व रस्ते,पूल,बंधारे वाहून गेले आहेत तर वीज वितरण व्यवस्थेचे देखील नुकसान झाले असल्याचे आ.पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे .

 उद्धवजी हेक्टरी ₹ २५००० देऊन ठाकरी बाणा दाखवा - आ.राणा पाटील


१५ दिवसापूर्वी पिकांची परिस्थिती अतिशय चांगली होती त्यामुळे शेतकरी या हंगामात चांगलं उत्पन्न मिळेल या आशेवर बसले होते.मात्र पावसाने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे.सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने अजून भर पडली आहे.नुकसानीची व्याप्ती पाहता आता यावर चर्चा न करता सरसकट मदत देणे योग्य राहील असे आ. पाटील यांनी म्हटले आहे.


गेल्यावर्षी सातारा,सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापुर आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित शेतकऱ्यांनी घेतलेले सर्व पिकांसाठीचे २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांसाठीचे १ हेक्टरपर्यंत बँक कर्ज माफ केले होते.तसेच नुकसानभरपाई म्हणून स्थायी आदेशाच्या पलीकडे जाऊन दुपटीने नगदी स्वरूपात मदत केली असल्याचे आ.पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.


सणासुदीचे दिवस जवळ आले असताना हाता तोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत.आता त्याला झालेल्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.राज्यातील कांही मंत्री सरकारकडे पैसा नाही अशी विधान करत आहेत.मात्र सरकारला महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या (जीएसडीपीच्या) ५% रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध होऊ शकते जी की अधिकचे जवळपास १ लाख ६० हजार कोटी इतकी आहे त्यामुळे पैसा नसेल तर प्रचलित पद्धतीने कर्ज काढून मदत करावी असे आ.पाटील यांनी म्हटले आहे.


गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसानं राज्यात अनेक ठिकाणी असेच नुकसान केले होते.तेंव्हा औरंगाबाद येथे नुकसानीची पाहणी केल्यावर आपण सरकारला कोणत्याही अटी न ठेवता तातडीने हेक्टरी ₹ २५००० मदत देण्याची मागणी केली होती.आता मुख्यमंत्री या नात्याने राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती आहेत त्यामुळे आपण त्वरेने शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्यावर्षी केलेल्या न्याय मागणीची पूर्तता करून "जे बोलतो ते करून दाखवतो" हा आपला बाणा सत्यात उतरवा असे आवाहन आ.पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केले आहे.


आपण पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेच्या पदरात या जिल्ह्यातील जनतेने नेहमीच मोठं माप टाकलेले आहे याची जाण ठेवून सणासुदीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने कोरडवाहू पिकांना  सरसकट हेक्टरी ₹ २५०००/-  तर बागायती व फळपिकांना  हेक्टरी ₹ ५०००० मदत १५ दिवसाच्या आत द्यावी,अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनी घेतलेले सर्व पिकांसाठीचे १ हेक्टरपर्यंत बँक कर्ज माफ करण्यात यावे  व जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेली घरे,रस्ते,पूल व बंधारे यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करावा व याची  कालबध्द अंमलबजावणी व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकारी नेमण्यात यावा या मागण्या आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी केल्या आहेत.


From around the web