उस्मानाबाद तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश , दोघांचा शोध सुरू 

 
s

 उस्मानाबाद  - उस्मानाबाद  तालुक्यात शुक्रवारी  रात्री झालेल्या  पावसामुळे नदी - नाले भरून वाहिल्याने तालुक्यातील बोरगाव  आणि समुद्रवाणी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन व्यक्ती  वाहून गेले आहेत . त्यांचा शोध घेण्याचे काम रात्रीपासून विविध यंत्रणांच्या मदतीने सुरू आहे तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे , अशी माहिती उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी दिली आहे .                    

उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव राजे -  बोरखेडा  रस्त्यावरील  ओढ्यातून बोरखेडा येथील ओढ्यावरील पुलावरून जाताना समीर युन्नूस शेख ( वय 27 ) हे वाहून गेले आहेत . श्री शेख हे  मोटरसायकलवर होते  एका शेतकऱ्याने त्यांना  पाण्यात जाण्यास मनाई करूनही वाहत्या पाण्यात गेल्यामुळे ते  वाहून गेले .गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.अद्याप त्यांना शोध लागला नाही.पोलीस, महसूल ,  नगरपरिषद आणि  उस्मानाबाद फायर ब्रिगेडची टीम पाठवण्यात आली आहे .      

          

समुद्रवाणी या गावातील पुलावरून एक इंडिका कार पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चौघे जण होते . त्यापैकी दोघे पाण्याचा अंदाज घेण्यासाठी उतरले होते तर दोघे कारमध्ये होते . वाहून जाणाऱ्या कारमधील  मेढा येथील गोवर्धन विष्णू ढोरमारे ( वय ५५) आणि बाबा विश्वनाथ कांबळे या दोघांना गावकऱ्यांच्या मदतीने सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले आहे . दरम्यान , समुद्रवाणी  येथे पूर पाहण्यास गेलेला एक  व्यक्ती पुरात वाहून गेला आहे . तो अद्याप सापडलेला नाही .त्यांचाही शोध घेण्याचे कार्य सुरू आहे , असेही तहसीलदार श्री . माळी यांनी सांगितले .

From around the web