निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा

आ. राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
 
निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा

उस्मानाबाद - मराठवाड्यातील पहिला  सहकारी साखर कारखाना असलेला तेरणा कारखाना मागील 10 वर्षांपासून चक्क बंद आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे. गतवर्षीचा समाधानकारक पाऊस आणि यंदाची अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यात उसक्षेत्र वाढले आहे. परिणामी पुढील वर्षी अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.  त्यासाठी तेरणा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करणे अत्यावश्यक आहे. तेरणा कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम तात्काळ जाहीर करावा, शासकीय थकहमी अदा करावी आणि नवनिर्वाचित संचालक मंडळ तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून कारखाना दिर्घमुदतीसाठी भाड्याने देण्याकरिता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी . मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यंदा तेरणा कार्यक्षेत्रासह जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यासाठी किमान पुढच्या वर्षी तेरणा कारखाना सुरु होणे अत्यावश्यक आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी करण्याकरीता तुळजापुर येथे आलेल्या नेत्यांनी तेरणा सुरु करणे शक्य नसल्याचे दुर्दैवी वक्तव्य केले होते. या धक्कादायक वक्तव्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुख्यमंत्री महोदयांकडे शिष्टमंडळासह भेटण्याची विनंतीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. तेरणा कारखाना बंद असल्याने ढोकी सह परिसरातील सर्वच क्षेत्रातील व्यवसाय अक्षरशः ठप्प आहेत. अर्थकारण मंदावल्याने तेरणा पुन्हा सुरु होवून त्यास गतवैभव प्राप्त व्हावे, अशी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची आग्रही मागणी आहे.

शेतकरी सभासदांच्या हितासाठी कारखान्यावर सभासदांनी निवडुन दिलेले संचालक मंडळ अस्तित्वात असणे आवश्यक आहे. सन २००७ नंतर कारखान्याची निवडणुकच झालेली नाही. तेरणा कारखान्याच्या कर्जापोटी महाराष्ट्र शासनाने उस्मानाबाद जिल्हा बँकेला थकहमी दिलेली आहे. या अनुषंगाने बँकेने शासनाकडे  १२४ कोटी ५० लाख रुपयांची मागणी केलेली आहे. थकहमीची सदरील रक्कम बँकेला मिळाल्यास उर्वरित कर्जाच्या वसुलीपोटी नवनिर्वाचित संचालक मंडळ व बँकेच्या माध्यमातून तेरणा कारखाना दिर्घ मुदतीने भाडे तत्वावर चालविण्यास देता येऊ शकेल. यामुळे शेतकरी सभासदांचे हक्क अबाधीत राहतील आणि त्यांचे हित जोपासत बँकेची देखील वसुली होईल. परीसरातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास मदत होईल. यापूर्वी जिल्ह्यातील बाणगंगा व भाऊसाहेब बिराजदार हे दोन्ही सहकारी साखर कारखाने अशा पद्धतीने संचालक मंडळाच्या देखरेखीखाली  दीर्घकालीन मुदतीवर भाड्याने चालविण्यास देण्यात आले आहेतच. हे कारखान्याने सध्या सुरळीतपणे सुरू आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.

बांगणगा आणि भाऊसाहेब बिराजदार कारखान्याप्रमाणेच तेरणा कारखानाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू होणे आता गरजेचे आहे. कार्यक्षेत्रातील वाढलेले ऊसाचे क्षेत्र, सभासदांचे व बँकेचे हित लक्षात घेऊन कारखाना सभासद, कर्मचारी व परिसरातील नागरिकांच्या वतीने तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची तात्काळ निवडणुक घेणेबाबत योग्य ते आदेश दयावेत, थकहमीपोटी शासनाकडे असलेले १२४ कोटी ५० लाख रुपये तातडीने जिल्हा बँके कडे वर्ग करावेत, नवनिर्वाचित संचालक मंडळ व बँकेला कारखाना दिर्घ मुदतीवर चालविण्यास देण्याची परवानगी देण्यात यावी तसेच तेरणा कारखाना सभासद शिष्टमंडळाला भेटण्यास वेळ द्यावी अशी आग्रही मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याकडे केली आहे.    
 

From around the web