कृषी विभागाकडून खरीप 2021 चे नियोजन

  कृषी निविष्ठा सनियंत्रणासाठी 9 भरारी पथके
 
कृषी विभागाकडून खरीप 2021 चे नियोजन

उस्मानाबाद -कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून खरिपाचे नियोजन करण्यात आलेले आहे.कृषी विभागाकडून खरिपाचे 560422 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे.कृषी निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर आठ असे एकूण नऊ भरारी पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.उमेश घाटगे यांनी दिली आहे. 


      भरारी पथकाद्वारे कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना एम.आर.पीपेक्षा जादा दराने खत विक्री न करणे, लिंकींग न करणे, सोयाबीन बियाणे साठवणूक व विक्री करताना काळजी घेणे तसेच बियाणे, खते व किटकनाशके कायद्याचे पालन करुन चांगल्या दर्जाच्या कृषी निविष्ठा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

          कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके या कृषी निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी आणि कृषि सेवा केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी गटामार्फत खरेदी करण्यासाठी कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये कृषी निविष्ठेचा पुरवठा सुरळित होण्यासाठी कृषि निविष्ठांची वाहतूक सुरु आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी. खरेदीची पक्की पावती घ्यावी, पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठांचा संपूर्ण तपशील, विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. 

अनुदानित रायासनिक खताची खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून ई-पॉस मशीनवरील बिल घ्यावे व खरेदी केल्यानंतर खताच्या बॅगवरील किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासून घ्यावे. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग, वेस्टन, पिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावेत. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी. त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत. खते, बियाणे यासंदर्भात तक्रार असल्यास तालुका तक्रार निवारण कक्षास तक्रार नोंदवावी. 

      जिल्ह्यात सर्वाधिक 3,74,600 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होणार आहे. मका, तूर, उडिद, मूगाचीही सर्वाधिक पेरणी होईल. मृग नक्षत्रात चांगला पाऊस होऊन वेळेवर पेरणी झाल्यास उडिद व मूगाचे क्षेत्र वाढून सोयाबिन क्षेत्रात थोडी घट होऊ शकते. त्यादृष्टिने नियोजन करण्यात येत आहे. सार्वजनिक क्षेत्रातून 56,750 क्विंटल बियाणे व खाजगी क्षेत्रातून 37,974 क्विंटल बियाणे असे एकूण 94,724 क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी रासायनिक खताचे 63,190 मे.टनाचे आवंटन मंजूर झालेले आहे. रासायनिक खताचा जिल्ह्याचा सरासरी वापर 57,275 मे.टन असून एप्रिल अखेरपर्यंत 30,148 मे.टन खते जिल्ह्यात उपलब्ध असल्याची माहितीही घाटगे यांनी दिली.

From around the web