१०००० रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असलेल्या कौडगाव औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष का ?

 
उद्योगमंत्री देसाई यांना आ.राणाजगजीतसिंह  पाटील यांचा सवाल

१००००  रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असलेल्या कौडगाव औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष का ?


उस्मानाबाद  - गेली सहा वर्षे उद्योग खाते आपल्याकडे आहे, जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेला ज्यापद्धतीने भरभरून साथ दिलेली आहे.आता तर मुख्यमंत्रीच शिवसेनेचे आहेत तरी देखील उस्मानाबाद जिल्ह्यात १०००० हुन अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य असलेल्या कौडगाव या मराठवाड्यातील दोन नंबरच्या सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्राचा (२५०० एकर ) विकासाच्या महत्वपूर्ण विषयाबाबत आपले अक्षम्य दुर्लक्ष का आहे ? असा खडा सवाल आ.राणा पाटील यांनी शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना केला आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात शेती हेच जनतेच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे धारण क्षमता कमी होत असल्याने शेतीत देखील रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत.परिणामी युवकांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागते व हजारो युवक आपल्या हाताला काम मिळत नसल्याने नैराश्याकडे झुकत आहेत.त्यामुळे येथील तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी औद्योगिकरण वाढीला लागणे अत्यंत गरजेचे असल्याचे आ.राणा पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

आ.पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात औद्योगिकरणाला चालना मिळावी म्हणून सातत्याने  विधिमंडळ,पत्र,प्रत्यक्ष भेटून व आंदोलनाच्या माध्यमातून कौडगाव औद्योगिक वसाहतीतीत उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी धोरण आखणे, सौर प्रकल्प,टेक्निकल टेक्सटाईल पार्क आदी मुद्द्यांबाबत पाठपुरावा करत आहे.नवीन सरकार स्थापण झाल्यावर देखील  २ वेळा पत्र लिहले मात्र अजून त्यावर कसलीही कार्यवाही होत नाही याबद्दल खेद वाटत असल्याचे म्हटले आहे.

तांत्रिक वस्त्र निर्मितीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला संधी असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे व उद्योग मंत्री म्हणून आपाल्याकडे उस्मानाबाद येथे “Technical Textile Hub” उभारण्याची मागणी केली होती. यावर खूप चर्चेनंतर आपण “Technical Textile Hub”उभारणीच्या प्रस्तावावर ठाम झालो होतो. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी १ सप्टेंबर २०१९ रोजी उस्मानाबाद येथे“Technical Textile Hub” उभारण्याची घोषणा केली होती.त्यानंतर MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी याबाबत के.पी.एम.जी. या जगविख्यात तांत्रिक सल्लागार कंपनीकडून प्राथमिक अहवाल तयार केलेला आहे.तरी देखील याबाबत कांहीच हालचाल होत नाही हे अनाकलनीय असल्याचे आ.पाटील यांनी उद्योगमंत्र्यांना लिहले आहे.


अशातच  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रासाठी अधिगृहीत केलेल्या भूखंडाचे सेवा शुल्क रद्द करण्यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला व सदर विषय बोर्ड मिटिंग मध्ये ठेवण्यास सांगितल्याबद्दल त्यांनी देसाई यांचे आभार मानले असून हा विषय जरी महत्वाचा असला तरी त्यापेक्षा अधिक महत्वाचा विषय हा उस्मानाबाद जिल्ह्यात १०००० हुन अधिक रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य असलेले कौडगाव या मराठवाड्यातील दोन नंबरच्या सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्राचा (२५०० एकर ) विकास हा आहे,मात्र या सारख्या महत्वाच्या विषयांवर आपले अक्षम्य दुर्लक्ष का आहे ? असा सवाल उपस्थित केला आहे.

 .
जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार आहेत. गेली ६ वर्षे आपण उद्योग मंत्री आहेत त्यामुळे आपण शिवसेनेचे मंत्री व राज्याचे उद्योग मंत्री म्हणून पुढाकार घ्यावा व उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी व इथल्या तरुणांच्या हाताला काम देऊन अर्थकारणाला चालना मिळावी यासाठी व्यक्तिशः लक्ष द्यावे व कौडगाव,उस्मानाबाद येथील औद्योगिक वसाहतीत“Technical Textile Hub” उभारणीच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन केंद्र शासनाकडे पाठवणे. कौडगाव औद्योगिक वसाहतीत सोलर व इलेक्ट्रॉनिक्स पार्टसच्या निर्मितीचे पार्क स्थापन करणे. कौडगाव येथे २५० मेगा वॅट क्षमतेचा हायब्रीड सौर प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची वर्चुअल बैठक आयोजित करावी व त्यावर तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी आ.पाटील यांनी केली आहे.

From around the web