टाकळी (बेंबळी) च्या शेतकऱ्याचा दीड एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक
![टाकळी (बेंबळी) च्या शेतकऱ्याचा दीड एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/a08f0201b6af39be4e4cd5a17803d63a.jpg)
पाडोळी - अतिवृष्टीतून सावरलेल्या टाकळी (बेंबळी) च्या एका शेतकऱ्याला महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मोठा फटका बसला आहे. शेतातून गेलेल्या विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतातील उभा दीड एकर ऊस जळून खाक झाला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी (बेंबळी ) येथील शेतकर नरहरी पांडुरंग शिरगिरे यांच्या गट नंबर ४७ मधील दीड एकर ऊसामधून महावितरणच्या तारा गेल्या असून आज (दि. १७) त्या तारामध्ये शॉर्टसर्किट होऊन दीड एकर ऊसासह स्पिनकलरचे तीस पाईप जळून खाक झाले आहेत. महावितरणच्या या ढिसाळ कारभारामुळे शिरगिरे यांचे जवळपास दोन लाख पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.
शिरगिरे यांनी मागीलवर्षी नोव्हेंबर मध्ये आपल्या शेतात दीड एकर ऊसाची लागवड केली होती,कूपनलिकेच्या तुटपुंज्या पाण्यावर त्यांनी ऊस जोपासला होता, हातातोंडाशी आलेला घास महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे हिरावला गेला आहे.
यापूर्वी शिनगारे यांनी या तारा दुरुस्त करून घ्या, म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा मागणी केली होती मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे डोळेझाक केली होती, असं शिरगिरे यांचं म्हणणं आहे. किमान आता तरी त्वरित पंचनामा व्हावा व लवकर ऊस कारखान्यास जावा अशी शिरगिरे यांची अपेक्षा आहे.परिसरातील कारखान्याच्या दिरंगाईमुळे या आधीच ऊस जाण्यास विलंब लागत होता, त्यात महावितरणने अडचणीत भर टाकली आहे.