धाराशिव जिल्ह्यात यापुढे महापुरुषांच्या जयंती व सार्वजनिक उत्सव डॉल्बीमुक्त होणार 

सर्व समाजाच्या वतीने एकमुखी निर्णय
 
s

धाराशिव  - धाराशिव  जिल्ह्यामध्ये प्रत्येक महापुरुषांच्या जयंती व सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी डॉल्बीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. मात्र या डॉल्बी मानवी शरीरासाठी अतिशय घातक असून त्यांच्या करणे आवाजामुळे  शरीराच्या वेगवेगळे अवयवांवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे संपूर्ण जिल्हाभरातील शहरासह ग्रामीण भागात सर्व महापुरुषांच्या जयंती मिरवणुका, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम व लग्न समारंभ डॉल्बीमुक्त करण्याचा सर्व समाजाच्या बैठकीमध्ये एक मुखी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दि.६ जुलै रोजी केले.

उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत धार्मिक सण, उत्सव महापुरुष जयंती साजरी करणाऱ्या मंडळाच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, डॉ विशाल वडगावकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख, कार्डीओलॉजिस्ट डॉ विशाल वडगावकर, डॉ स्वप्नील यादव आदी यांच्यासह विश्वास शिंदे, प्रकाश जगताप धनंजय शिंगाडे, मसूद शेख, अतुल बागल, मैनोद्दीन पठाण, बाळासाहेब शिंदे, महबूब पाशा पटेल, प्रभाकर लोंढे, विष्णू इंगळे, सिद्धार्थ बनसोडे, विशाल शिंगाडे, रॉबिन बगाडे, इम्तियाज बागवान, मेसा जानराव, कुंदन वाघमारे, विलास लोंढे उपस्थित होते. 

पुढे बोलताना डॉ ओंबासे म्हणाले की, पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मॉ जिजाऊ, माता रमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भगवान महावीर, ऊरुस, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आदींसह विविध महापुरुषांच्या जयंत्या व धार्मिक कार्यक्रम बँड, हलगी व झांज पथक या पारंपारिक वाद्यांमध्ये साजरी केली जात होती. मात्र आता त्या पारंपारिक वाद्याला बगल देण्यात आले असून डॉल्बी वाद्यावरच सर्वत्र भर देण्यात येत आहे. या डॉल्बीचा आवाज अतिशय कर्ण कर्कश असतो. त्यामुळे अनेक लहान बालके, वयोवृद्ध व्यक्ती व सर्वसामान्य व्यक्तींच्या अवयवावर विपरीत परिणाम होत आहे. या कर्ण कर्कश आवाजामुळे हृदयविकार कायमचे बहिरेपणा व अनेक नागरिकांचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे ही प्रथा मानवी जीवनावर बेतत असून मानवा अतिशय घातक असल्यामुळे डॉल्बी बंद करण्याची मागणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्व समाज घटकांतील प्रतिनिधी व व्यक्तींचा केली आहे. 

हा निर्णय जिल्हा वाशियांसाठी अतिशय महत्त्वाचा व चांगला निर्णय असून आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे बँड, हलगी व झांज पथक या पारंपारिक वाद्याचा सर्व जयंती उत्सव व लग्न समारंभ पार पाडावेत असे आवाहन डॉ ओंबासे यांनी केले. तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, डॉल्बीच्या कर्ण कर्कश आवाजामुळे उस्मानाबाद शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालय, निरामय व सुविधा हॉस्पिटलमधील अनेक रुग्णांची शारीरिक स्थिती बिघडल्याचे मी प्रत्यक्ष या मिरवणुकी दरम्यान अनुभवले आहे. विशेष म्हणजे डॉल्बीचा आवाज शासनाने ठरवून दिलेल्या ५० ते ६० डेसिबल ऐवजी १४० डेसिबलपर्यंत आवाज मिरवणुकीमध्ये वाढविला जातो. ते अतिशय चुकीचे असून शारीरिक अवयव निकामी करण्याचे काम या आवाजाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगत डॉल्बीमुक्त सर्व उत्सव साजरे करावेत अशी आवाहन त्यांनी केले. 


यावेळी डॉ विशाल वडगावकर, डॉ सचिन देशमुख, डॉ. स्वप्नील यादव, उस्मानाबाद उपविभागीय प्रभारी स्वप्निल राठोड, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर विश्वास शिंदे, प्रकाश जगताप, धनंजय शिंगाडे, मसूद शेख, विशाल शिंगाडे आदींसह इतरांनी या चर्चेत भाग घेत संपूर्ण जिल्ह्यासाठी डॉल्बीमुक्त करण्याचा मनोदय व्यक्त केला.

सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी तर प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड मानले. यावेळी उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

From around the web