पिक विमा मिळेपर्यंत लढा देणार - आ. कैलास पाटील    

 
पिक विमा मिळेपर्यंत लढा देणार - आ. कैलास पाटील

उस्मानाबाद  - पिक विमा कंपनीने घालुन दिलेली 72 तासाच्या अटीचा नियम बाजुला सारुन शासनाने जे सर्व्हेक्षण केले आहे ते ग्राह्य धरुन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सुचना राज्य सरकारने केल्या असल्याचे उत्तर कृषीमंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिले आहे. उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी ही माहिती दिली असुन त्यानीच सभागृहामध्ये शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर 2020 मध्ये अतिवृष्टी झालेली होती, त्यामध्ये काढणीला आलेल्या तसेच काढणी झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. त्यावेळी राज्य शासनाने पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. मात्र विमा कंपनीने यामध्ये नुकसान झालेल्या वेळपासुन 72 तासाच्या अगोदर ऑनलाईन तक्रार करण्याची अट घातली होती. साहजिकच यामध्ये अनेकांना ही अर्ज करण्याची प्रक्रिया लक्षात आली नाही. त्यामुळे अशा सर्व बाधित शेतकऱ्यांना विमा भरपाईपासुन कंपनीने वंचित ठेवल्याचे निर्दशनास आले आहे. 

याविषयी आमदार कैलास पाटील यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करुन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पुढाकार घेण्याची मागणी लावुन धरली. अशी 72 तासाची अट धरली तरी 20 जुन 2019 च्या शासन निर्णयाचा आधार घेत आमदार कैलास पाटील शेतकऱ्यांना मदत देता येत असल्याचे दाखवुन दिले.नुकसान झालेले क्षेत्र 25 टक्क्याहुन अधिक असल्यास त्यांना सरसकट मदत करता येत असल्याचे त्या निर्णयामध्ये म्हटले आहे. त्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये 639 कोटी हप्ता शेतकऱ्यांनी भरला होता, त्या बदल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई फक्त 49 कोटी एवढीच दिली गेली आहे. तीन लाख 63 हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाचे होते, त्यातील एक लाख 90 हजार  हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.25 टक्क्याहुन अधिक क्षेत्र बाधित असुन कंपनीने अटीचा निकष पुढे करुन शेतकऱ्यांना मदतीपासुन वंचित ठेवल्याचे आमदार पाटील यानी सांगितले.

 यावर उत्तर देताना कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले की,नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत कळवावे असा नियम असला तरी नंतरही शेतकऱ्यांना तक्रारी करता येऊ शकतात. विमा कंपनीचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले नसेल तर शासनाने केलेल्या सर्व्हेक्षण ग्राह्य धरुन शेतकरी बांधवाना मदत देण्याबाबत सुचना केल्याचे श्री. भुसे यानी सांगितल्याचे आमदार पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकामध्ये म्हटले आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांना पिकविमा मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरुच राहिल असाही विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

From around the web