मुलींनी आई वडिलांचे संस्कार विसरु नये - युगराज जैन
![s](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/0b7c63f7851fdbadc1bee1909a92e72a.jpeg)
धाराशिव (उस्मानाबाद) - ज्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले त्या आई वडिलांचा आजच्या पिढीला विसर पडत चालला आहे. बदलल्या तंत्रज्ञानाच्या काळात मुलींनी आपले संस्कार विसरु नयेत. आई वडिलांचा आदर करावा. अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी मुलींनी सतर्कता बाळगली पाहिजे. कोणत्याही मोहाला बळी पडता महापुरुषांनी दिलेल्या विचारांवर वाटचाल करुन आपल्या संस्कृतीचे जतन करावे असे मत प्रसिद्ध वक्ते युगराज जैन (मुंबई) यांनी केले.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यनिमित्त सोहळ्यात गुुरुवारी (दि.16) सायंकाही शहरातील लेडीज क्लबच्या मैदानावर युगराज जैन यांचे ‘बहना तुझसे है कुछ कहना’ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील, सिद्धीविनायक परिवारचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी, अॅड.मिलिंद पाटील, गणेश साळी, डॉ.अभय शहापूरकर, सुनील काकडे, आशिष मोदाणी, प्रदीप मुंडे, राजसिंह राजेनिंबाळकर, अमित घोगरे, धनंजय रणदिवे, राहुल काकडे, सुधीर सस्ते, डॉ.प्रशांत पवार, डॉ.सौ.विधाते, नंदाताई पुनगडे, शिवराज्याभिषेक सोहळा शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी, उपाध्यक्ष रवी मुंडे, सचिव कंचेश्वर डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना युगराज जैन म्हणाले की, भारत देश ही संतांची, महापुरुषांची भूमी आहे. याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राज्यकर्ते जन्माला आले. त्यांच्या विचाराचे अनुकरण विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. शालेय शिक्षण घेत असताना आपले ध्येय निश्चित करावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करुन वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर आपण या क्षेत्रात चांगले करिअर घडवू शकलो असतो असा विचार मनात येतो. परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्याचबरोबर आपला देश, आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी महापुरुषांनी दाखवून दिलेल्या मार्गावर वाटचाल करावी असे सांगून बालपण, तरुणपण आणि वृद्धाकाळ या आयुष्यातील तीन टप्प्यांविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात गरजू कुटुंबाना प्रातिनिधीक स्वरुपात मोफत शेळ्यांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्य हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या मावळ्यांनी परिश्रम घेतले.