टाकळी (बें.) येथे गोळीबार करून फरार झालेले चारजण जेरबंद
![s](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/0460620850ed560eed72783ddc8617a9.jpg)
बेंबळी: टाकळी (बें.) येथे गोळीबार करून फरार झालेल्या चारही आरोपीना जेरबंद करण्यात पोलिसाना यश आले आहे. पाच वर्षांपूवी विक्री केलेल्या मोटारसायकलचे पैसे मागितले म्हणून चक्क गोळीबार करून सर्व आरोपी पुण्याच्या दिशेने फरार झाले होते. खेड शिवापूर पोलिसांनी त्यांना अटक करून बेंबळी पोलिसांच्या हवाली केले आहे.
टाकळी (बें.), ता. उस्मानाबाद येथील अनिल राम सुर्यवंशी यांची मोटारसायकल गावकरी- दिपक धनाजी जगताप यांनी 5 वर्षांपुर्वी उधारीत विकत घेतली होती. ते पैसे परत करण्यास अनिल सुर्यवंशी यांनी दिपक जगताप यांच्याकडे तगादा लावला होता. अनिल सुर्यवंशी हे गावकरी- राजदिप व सचिन जगताप यांसह दि. 01.05.2021 रोजी 16.30 वा. सु. गावातील समाजमंदीरात बसले होते. यावेळी दिपक जगताप यांसह तीन अनोळखी व्यक्ती दोन मोटारसायकलवर तेथे आले.
अनिल सुर्यवंशी हे मोटारसायकलचे पैसे मागत असल्याचा वाद उकरुन काढून दिपक जगताप यांनी अनिल सुर्यवंशी यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावले असता दिपक सोबतच्या तीन अनोळखी व्यक्तींनी दिपक यांना चिथावणी दिली. दरम्यान अनिल सुर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखुन दिपक यांच्या हाताला झटका दिल्याने पिस्तुलातील काडतूस जमीनीवर झाडले जाउन त्यातील छर्रे राजदिप व सचिन जगताप यांना लागून ते दोघे गंभीर जखमी झाले.
झाडलेले रिकामे काडतुस बाजूला पडले असता दिपक जगताप याने उचलून घेतले व त्यानंतर सहकाऱ्यांसह त्याने घटनास्थळावरुन मोटारसायकलसह पलायन केले होते. अनिल सुर्यवंशी यांनी दि. 02.05.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 326, 323, 107, 201, 504, 506, 34 सह शस्त्र अधिनियम कलम- 3, 25, 27 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.