अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा बोध घेऊन शेतकऱ्यांनी खरीपाचा विमा हप्ता भरावा

- आमदार राणा जगजितसिंह पाटील
 
s

उस्मानाबाद - दि.०९.०७.२०२१ रोजी उस्मानाबाद तालुक्यातील काही भागात वातावरणीय बदलामुळे झालेल्या मुसळधार पावसाने जीवितहानीसह खरीप पिके, शेती व मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुर्दैवाने दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींचा सातत्याने सामना करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी विमा मिळाला नाही म्हणुन नाउमेद न होता या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा बोध घेऊन खरीप २०२१ चा पिक विमा हप्ता भरुन पिके संरक्षीत करुन घेण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटुन माती वाहून गेली आहे, अनेकांच्या शेतात तलावा प्रमाणे पाणी साचले आहे. खरीप पिकांचे यामुळे अतोनात नुकसान झाले असून अनेक ठिकाणचे रस्ते व पुलांची हानी झाली आहे. या अनुषंगाने आज आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी कामेगाव, बोरखेडा, सांगवी, समुद्रवाणी, मेंढा, घुगी, लासोना, टाकळी (बें.), बोरगांव (राजे), कनगरा या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानीपोटी केंद्र/राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून लवकरात लवकर भरीव मदत मिळवून देण्याचे आश्वासित केले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे त्यांनी FARMITRA या मोबाईल ॲपवर अथवा टोल फ्री क्रमांक १८००२०९५९५९ वर नुकसानीची सुचना देण्याचे आवाहन केले.

या नैसर्गिक आपत्ती मध्ये बोरखेडा येथील युवक समीर शेख यांचा वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर लासोना येथील बबन रसाळ या वाहून गेलेल्या व्यक्तीचा अद्याप शोध सुरु आहे. महसूल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्यांना शोधण्यासाठी परिश्रम घेण्यात येत आहेत. पीडीत कुटुंबियांना भेटून घटनेप्रती संवेदना व्यक्त करत सांत्वन करुन शासनाकडून आर्थिक मदतीची ग्वाही दिली. लासोना येथील शेतकरी श्री.परमेश्वर स्वामी व श्री.प्रशांत नाईकनवरे यांनी शेडनेटमध्ये मोठया कष्टाने जोपासलेल्या सिमला मिरचीचे शेडनेटमध्ये पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यांची देखील भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली व धीर दिला.

महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेती, पिके व मालमत्तेचे झालेले नुकसान पंचनाम्यातून स्पष्ट होईल व पंचनामे पूर्ण होताच शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी महसुल व कृषी विभागाच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावेत व त्याची प्रत घ्यावी.

या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतुन  खरीप पिके संरक्षीत करण्याची गरज अधोरेखीत होत आहे. परंतु या वर्षी पिक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याचे दिसुन येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी खरीपात आता पर्यंत केवळ २५ टक्के शेतकऱ्यांनीच पिक विमा भरला आहे. गेल्या वर्षी विमा मिळाला नाही म्हणुन शेतकऱ्यांनी नाउमेद होऊ नये, हा विमा मिळवुन देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरु आहेत. वातावरणीय बदलामुळे ढगफुटी, पावसातील खंड अशा नैसर्गिक आपत्तींचा भविष्यातही सामना करावा लागु शकतो, त्यामुळे या नुकसानीचा बोध घेता पिक विमा न भरणे अव्यवहार्य असुन शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा हप्ता भरुन पिके संरक्षीत करुन घ्यावीत असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील  यांनी केले आहे.

 यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, तहसीलदार श्री.गणेश माळी, तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव, जि.प.बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, राजसिंह राजेनिंबाळकर, नागप्पा पवार, संगमेश्वर स्वामी, युवराज ढोबळे, विजयसिंह जंगाले, नीलकंठ पाटील, बाळासाहेब खांडेकर, ओम मगर, दयानंद शिंदे तसेच प्रमुख पदाधिकारी तसेच मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी आदी उपस्थित होते.

From around the web