पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

 जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन      
 
d

उस्मानाबाद  - जिल्हयाचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५ लाख 32 हजार 739 हेक्टर  हेक्टर आहे. प्रत्यक्षात 5 लाख 36 हजार 664 हेक्टरवर पेरणी झाली आहे.जिल्हयामध्ये सोयाबीन,तूर,उडीद, मूग,खरीप ज्वारी,बाजरी ही खरीप हंगामातील पीके आहेत.  सोयाबीन हे मुख्य पीक आहे.सोयाबीन पीकांची 3 लाख 63 हजार 123 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.सोयाबीन पीक सध्या वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेत आहे. पिकांची वाढ समाधानकारक आहे.तसेच तूर,उडीद,मूग,बाजरी,खरीप ज्वारी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. याही पिकांची वाढ समाधानकारक आहे. शेतकरी कीड आणि रोग नियंत्रणाकरीता विविध कीटकनाशकांची फवारणी करत असून फवारणी करताना विषबाधा होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ्‍ दिवेगावकर यांनी केले आहे. 

शेतात कीटकनाशके, तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी :-

  • शेतात उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात. हेच रासायनिक औषधे शेतकरी शेतात, झाडांवर फवारताना मुख्यत: तीन प्रकारे धोका निर्माण होवू शकतो.
  • रासायनिक औषधांचे अत्यंत बारीक कण हवेबरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात.
  • फवारणी करीत असताना त्वचेच्या संपर्कामधून तथा डोळयांव्दारे शरीरात जातात.फवारणी करतांना नकळत तोंडाव्दारे खाताना, बीडी पिताना शरीरात जाऊ शकतात.

कीटकनाशके वापर करताना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी :-

  1. कीटकनाशकाच्या प्रत्येक वेष्टना समवेत त्या कीटकनाशकाचे लेबल आणि महितीपत्रक अंतर्भूत असते. या लेबल  आणि  माहितीपत्रकामध्ये असलेली माहिती नीट वाचावी आणि समजनू घ्यावी.कीटकनाशके मूळ पॅकिंगमध्ये खरेदी करावीत.कीटकनाशके ही विषारी असल्याने त्यांची हाताळणी करतांना सदैव जागरूक रहावे.कीटकनाशके वापरण्याची साधनसाम्रगी जसे फवारणी पंप.नेहमी व्यवस्थित चालु ठेवावेत.गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन वापरावे.
  2.       कीटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना ते सांडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यासाठी नरसाळयाचा वापर करावा.तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा आणि तो पंप कीटकनाशक फवारणीसाठी वापरु नये.कीटकनाशक वापरताना संरक्षक कपडे उदा. गॉगल, पायात मोजे,गमबुट, तोंडाला मास्क,डोक्यावर कापड,आदी वापरावेत.फवारणीसाठी वापरलेले सर्व सहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत.झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत.कीटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे.फवारणीचे मिश्रण जेवढे लागणार आहे तेवढे एकदाच तयार करुन हाताने न ढवळता लांब लाकडी दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा.
  3.      कीटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा ध्रुमपान करणे टाळावे.पाऊस येण्यापूर्वी किंवा पाऊस झाल्यानंतर तसेच तीव्र उन्हात फवारणी करु नये.फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे.फवारणीचे वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे.उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी.  फवारणी करताना वापरलेली भांडी आदी साहित्य नदी, नाला किंवा विहीरीजवळ धूवू नयेत. तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे.
  4.     कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात.फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये त्यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी.कीटकनाशके फवारण्याचे काम करताना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावेत आणि वेळोवेळी स्वच्छ धुवून काढावेत.कीटकनाशके अंगावर पडू नयेत म्हणून वा-याच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये.तसेच उंच झाडावर फवारणी करताना औषध अंगावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
  5.       कीटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान दोन आठवडे जावू देवू नये.जमिनीवर सांडलेले कीटकनाशक हातानी न पुसता आणि त्यावर पाणी न टाकता ती माती , चिखल यांच्या सहाय्याने शोषून घ्यावेत.जमिनीत गाडून टाकावीत.डब्यांवरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. त्यानूसार सुरुवातीस हिरवा रंग कमी विषारी, निळा रंग मध्यम विषारी त्यानंतर पिवळा रंग तीव्र विषारी आणि शेवटी लाल अती तीव्र विषारी चिन्ह , खून असलेली औषधे क्रमाने वापरावे.  

विषबाधा झाल्याची लक्षणे :-

  • विषबाधा ही कीटकनाशके , तणनाशके यांचा त्वचेशी संपर्क अथवा पोटात गेल्यास होते. विषबाधा आणि इतर आजार यांचा लक्षणात बरेचदा साम्य राहू शकते.
  • विषबाधाची लक्षणे :-अशक्तपणा व चक्कर येणे.त्वचेची जळजळ होणे,डाग पडणे,घाम येणे.डोळयांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे.तोंडातून लाळ गाळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे.डोकेदुखी,अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जिभ लुळी पडणे, बेशुध्द होणे.धाप लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे.

विषबाधेची शंका आल्यास खात्री करा

  • रोग्याचा कीटकनाशकांसह संपर्क आला होता काय ? नेमके कोणते कीटकनाशके वापरले ? आंतरप्रवाही की स्पर्शजन्य ? डॉक्टरांसाठी वरिल माहिती महत्त्वाची आहे.रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा. कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी बांधवानी या प्रकारे काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी केले आहे.      

From around the web