उस्मानाबाद जिल्ह्यातील एक हजार महिला बचतगटांना आर्थिदृष्ट्या सक्षम करणार - जिल्हाधिकारी

 
उस्मानाबाद जिल्ह्यातील एक हजार महिला बचतगटांना आर्थिदृष्ट्या सक्षम करणार - जिल्हाधिकारी

उस्मानाबाद - जिल्ह्यात विविध यंत्रणामार्फत नोंदणीकृत असलेल्या आणि स्वत:चे उत्पादन सक्षमपणे करणाऱ्या एक हजार महिला बचत गटांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उपक्रम जिल्हयात राबविण्यात येईल,अशी माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  दिली.

        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकत्याच आयोजित केलेल्या महिला आणि बालकल्याण विभागाशी संबंधित विविध समित्यांची बैठक जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी डॉ. विजयकुमार फड,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच.निपाणीकर,शिक्षणाधिकारी गजानन सुसर,जिल्हा परिविक्षा अधिकारी शिरीष शेळके,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे,विधी सल्लागार श्री.पाटील,संरक्षण अधिकारी तोडकर,संरक्षण अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, विभावरी खुने,विधी व परिविक्षा अधिकारी जयश्री भाले,माहिती विश्लेषक विजय पवार,मनोज कुमार स्वामी, हर्षवर्धन बालेमोहकर,विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे डॉ.अहंकारी,वासंती मुळे, युनिसेफचे डॉ. राजेश कुकडे,लोकप्रतिष्ठानच्या डॉ.स्मिता शहापूरकर, माहिला विकास महामंडळाच्या शोभा कुलकर्णी,चाईल्ड लाईनचे श्री.गिरी,बालकल्याण समितीचे सदस्य श्री.कदम,श्री.कोळगे,श्रीमती गोसावी,श्रीमती कारभारी आदींची उपस्थिती होती.

 या बैठकीत बालविवाह,बालगृह निरीक्षण गृह समिती,बालक हेल्पलाईन,परिविक्षा समिती,जिल्हा पुनर्वसन समिती,सखी वनस्टॉप सेंटर, जिल्हा बालकल्याण समिती,सर्व समावेशक महिला सल्लागार  समिती,आदी समित्या बरोबरच महिला बचतगट,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी,इतर विधवा, परितक्त्या, एकल महिला आदी विविध 14 समित्यांचा आढावा सुमारे साडे चार तास चाललेल्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हयात मोठया प्रमाणात महिला बचतगटांची संख्या आहे.प्रत्येक महिला बचतगट आपापल्यापरिणे विविध प्रकारचे उद्योग, व्यवसाय आणि उत्पादने करताना दिसतात.परंतु त्यांच्या विक्रीची हमी नसल्याने त्यांचा व्यवसाय अडचणीत सापडून बचतगटाचे कामकाजही प्रसंगी अडचणीत येत असते.अशा महिला बचतगटांच्या उत्पादीत वस्तूंना विक्रीची हमी असलेली व्यवस्था निर्माण केली तर त्यांच्या उत्पादनांची विक्री होऊन या बचतगटातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल,असे सांगून श्री. दिवेगावकर यांनी त्याकरिता जिल्हयातील विविध संस्थातर्फे नोंदणीकृत असलेल्या एक हजार महिला बचतगटांची निवड करण्यात येणार आहे.पहिल्या टप्यात महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे जिल्हयातील महिला बचतगटांची नोंदणी करण्यात येणार आहे.यात त्याबचत गटाचे नाव,तो बचतगट कोणते उत्पादन,सेवाची उत्पादन करतो,किती प्रमाणात करतो,याची माहिती घेतली जाईल.त्यानंतर त्यांच्या उत्पादनास बाजारपेठेशी जोडण्याचे प्रयत्न केले जातील,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी,एकल महिला,विधवा महिला त्यातही 40 ते 45 वर्षातील महिलांचे काही प्रश्न आहेत.त्यांना समाजात निर्भिडपणे वावरण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्यांना सुरक्षित जीवन जगण्याची साधनं निर्माण करून देणे,त्यांना सामाजिक सुरक्षितता निर्माण करणे आणि सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना आत्मनिर्भर करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या नावे रेशन कार्ड देणे,त्यांची आधार नोंदणी करणे, विविध योजनांचा लाभ देणे ,त्यांच्या पतीच्या नावे असलेल्या शेतीचा फेरफार त्यांच्या नावे करणे,पती बरोबरच पत्नीचेही नाव सातबाऱ्यावर घेणे,घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणे आदी कामांना प्राधान्य देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यानी आश्वाशित केले.

        ‘विकेल ते पिकविले’ तर शेतकरी अडचणीत सापडणार नाही. तेव्हा शेतकरी महिला किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांनीही विकेल ते पिकविले तर त्यांच्या शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाच्या कृषी विभागातर्फे मदत केली जाईल,अशी माहिती या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यु.आर. घाटगे यांनी दिली.

        माविमतर्फे चालवल्या जाणाऱ्या बचतगटांच्या अनुषंगाने आणि माविमशी संबंधित एक समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीत डॉ.स्मिता शहापूरकर काम करीत आहेत.त्यांनी या समितीच्या कामांचे निरीक्षण आणि माविमच्या बचतगटांना अधिक सक्षम करण्याबाबतची माहितीही या बैठकीत दिली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.निपाणीकर यांनी संगणकीय सादरीकरणाव्दारे विविध समित्यांच्या कामांची माहिती देऊन सामित्यांच्या कामाचा आढावा सादर केला.

From around the web