बांबू लागवडीसाठी प्रत्येक गावातून पाच शेतकऱ्यांची निवड करावी -  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

 
बांबू लागवडीसाठी प्रत्येक गावातून पाच शेतकऱ्यांची निवड करावी - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

उस्मानाबाद -  जिल्हयातील 740 गावांतून प्रत्येकी किमान एक हेक्टरवर बांबू लागवड  करण्यासाठी  प्रत्येक गावांतून  पाच शेतकऱ्यांचे नावे निश्चित करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे दिले.

          शासकीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियेाजन समितीच्या सभागृहात जिल्हयातील वृक्ष लागवड आणि बांबू लागवड कार्यक्रमाची आढावा बैठक घेण्यात आली, तेव्हा ते बोलत होते.यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड माजी आमदार तथा राष्ट्रीय कृषी मिशनचे सदस्य पाशा पटेल, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपायुक्त श्री. गोटे,उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, विभागीय वन अधिकारी एम.आर.गायकर आदी उपस्थित होते.

 
जलवायू परिवर्तनाच्या  पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष लागवडीला खूप मोठे महत्व आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातही वन विभाग, सामाजिक वनीकरण ,कृषी विभागाच्या माध्यमातून वृक्षलागवडीचे कार्यक्रम राबविले जातात.परंतु  यापुढे या सर्व विभागामध्ये समन्वय असण्याची खूप गरज आहे.लावलेली झाडं जगवली पाहिजेत आणि लावलेली झाडं सर्व सामान्यांच्या  उपयोगासही आली पाहिजेत.वृक्ष लागवड ही  सर्व सामान्यांसाठी त्यांच्या दैनंदिन गरजेचा, उपयोगाचा भाग वाटला पाहिजे.शेतकऱ्यांना तो शेतीचाच एक भाग वाटला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी वृक्ष म्हणजेच उत्पन्नाचे साधन आहेत,असे वाटले पाहिजेत असे सांगून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी वर्तमानांचा विचार न करता भविष्याचा विचार करून झाडे लावली.निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठीही झाडे लावली. सावली बरोबरच आपल्या मुलांना-नातवांना फळं खाता यावीत म्हणून झाडे लावली म्हणून पूर्वी गावांभोवती अमराया असायच्या,शेतात खाण्यातील लिंबू, फळांच्या झाडांची रेलचेल असायची , चिंचेची झाडं असायची,कडु लिंबाची झाडं असायची,वड-पिंपळाची झाडे असायची. त्यामुळे पर्यावरणाचा तर समतोल साभाळला जावयाचाच. त्याचबरोबर फळंही खावयास मिळायची,अशा झाडांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहान देण्याची गरज आहे.प्रत्येक शेतकऱ्यांना या झाडांमध्ये शेतीचा व्यवसाय दिसला पाहिजे.त्याच अनुषंगाने बांबू लागवडीतून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला गती देता येईल.त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देता येईल, असेही ते म्हणाले.

          प्रत्येक गावांमध्ये ‘ घनवन’  किंवा देवराई विकसीत करण्यात येणार आहे.यासाठी शासकीय जागेशिवाय इतर एखादी जागा  संबधित अधिकाऱ्यांनी शोधून ठेवावी . प्राचीन मंदीर,डोगर या ठिकाणांचा वापर करावा.पाच महत्वाची झाडे  प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात लावली जातील यांचे नियेाजन करावे.प्रत्येक गावात शेत रस्त्याबरोबरच गाव तिथे पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठा करण्यात येणार आहे, असे सांगून श्री. दिवेगावकर म्हणाले की,शेतांना बांबूचे कुंपण करण्यावर भर दिला जावा. रोपवाटिकातील रोपांची संख्या आणखी वाढविण्यासाठी नव्याने वनविभागाने प्रस्ताव द्यावा, असेही  ते म्हणाले.

           नॅशनल बांबू मिशनकडून मराठवाडयातील  चार हजार हेक्टरसाठी बांबूची मोफत रोपे मिळणार आहेत.लातूर जिल्हयात केवळ अर्धा टक्का तर उस्मानाबाद जिल्हयात एक टक्काच जंगल आहे.आपण जंगलाचे क्षेत्र वाढविले नाहीतर आपल्या नव्या पिढीचे भवितव्य अंधकारमय आहे.हल्ली शेतकरी शेतात झांडे ठेवत नसल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांप्रमाणे झाडे लावण्याकडे वळवावे लागेल.केंद्र सरकारने आता बांबूस वनक्षेत्रातून काढुन गवत क्षेत्रात घेऊन त्यांची लागवड शेतीवर करण्यासाठी सोय केली आहे, असे सांगून श्री. पटेल म्हणाले की, गोदावरी- मन्याड-मांजरा नद्याच्या 2200 कि.मी.च्या क्षेत्रात बांबूची लागवड करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना शेतात बांबू लागवड करण्यासाठी मोफत बांबूची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.प्रत्येक गावांतून पाच तरूणांना यशदासारख्या संस्थातून वृक्ष लागवड, बांबू लागवड आणि पर्यावरणासंबंधिचे प्रशिक्षण देऊन या कामात  त्यांचा सहभाग  घेण्याचा मानस आहे.ग्लोबल वार्मिंगमुळे  माणसांचे मरण जवळ आहे. ते होऊ द्यावयाचे नसेल तर मोठया प्रमाणावर ऑक्सिजन देणाऱ्या बांबूची लागवड करावी लागेल.शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम करणारा बांबू आहे. त्याला सध्या मोठी मागणी आहे.इथेनॉल,सीएनजीची निर्मिती बांबूपासून तर होतेच त्याशिवाय प्लास्टीकला पर्याय म्हणून बांबूपासून अनेक वस्तू तयार केल्या जात आहेत.अशी माहितीही श्री.पटेल यांनी यावेळी दिली.

          जि.प.प्रांगण तसेच पंचायत समितीच्या प्रांगणात येथे बांबू लागवडीची माहिती मिळेल असे बोर्ड लावण्यात येतील. ‘सुंदर माझे कार्यालयातंर्गत’ हाही एक उपक्रम असेल.काही लावलेच नाही तर काही उगवणारच नाही तसे आता लावले तर उगवते आणि उगवले तर उपयोगात येते अशी भावना ठेवून वृक्ष लागवडीकडे वळावे लागेल.अधिकाऱ्यांनी स्वत:च्या शेतात बांबू लागवडीस प्राधान्य द्यावे म्हणजे इतर त्याचा आदर्श घेतील,असे सांगुन डॉ. फड

यांनी ज्या गावांत शंभर झाडे लावली असतील त्याच गावात मी कीर्तनासाठी येईल, अशी अट घातली आहे.तरीही  सोळा गावांमध्ये माझ्या कीर्तनाचे बुकींग झाले आहेत.मन चांगले करा म्हणजे कामेही चांगले होतील,असेही त्यानी यावेळी सांगितले.  यावेळी श्री.गायकर, श्री.गोटे बांबू लागवड केलेले शेतकरी राजशेखर पाटील यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री.कांबळे यांनी मानले.

From around the web