दिलासा : नैसर्गिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर
![दिलासा : नैसर्गिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/193a9f369cc3e7231c5990e4d5ef5809.jpg)
उस्मानाबाद :- नैसर्गिक नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २० कोटी ५८ लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. एक फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२० या कालावधीत वादळी वारा, पाऊस व गारपीठ यामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई महाविकास आघाडीच्या सरकारने मंजुर केली आहे. एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या २९ हजार ९४५ इतकी होती. त्यातील एकट्या कळंब तालुक्यातील बाधितांची संख्या २९ हजार ९२७ एवढी आहे. कळंब तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजुर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये २४ हजार ५६९ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झालेले होते.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच जिल्ह्यास्तरीय, तालुक्यास्तरीय अधिकारी यांच्यासोबत त्यावेळी बाधित क्षेत्राची पाहणी केली होती, शेतकऱ्यांशी संवाद साधुन परिस्थितीचा आढावा घेतला होता. आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देण्याबाबत संयुक्त पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची आपत्तीग्रस्ताना भरपाई मंजुर झाली आहे. ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्याना मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधिताना मदत देण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीच्या १६ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निधीची प्रतिक्षा होती, जिल्ह्यासाठी २० कोटी ५८ लाखाचा निधी मिळाला असुन कळंब तालुक्यात नुकसानीचा आकडा अधिक असल्याने कळंब तालुक्यासाठी १९ कोटी २७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही मदतीची रक्कम लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे.
यासंदर्भात उस्मानाबाद लाइव्हने काही दिवसापूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते.