उस्मानाबादेत कोरोनामुळे आणखी एका वकिलाचा मृत्यू

उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज किमान १० ते २० जणांचा मृत्यू होत आहे. मागील दहा दिवसांत सात वकिलांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जिल्हा विधिज्ञ मंडळाचे सदस्य अॅड. राम अनंतराव कुलकर्णी ( वय ४४ ) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. ते मूळचे तेरचे रहिवासी असून उस्मानाबादेत स्थायिक झाले होते.
यापूर्वी फौजदारी क्षेत्रातील ज्येष्ठ व नामांकित वकील अशी राज्यभर ओळख असलेले अँड दत्तात्रय उर्फ आबा बारखडे ( वय ६२ ) अँड भारती रोकडे ( वय ४६ ) अँड विनोद गंगावणे ( वय ४५ ) अँड बापूसाहेब गंजे (वय ५३ ) अँड नारायण वडणे ( वय ४५ ) व उमरगा येथील ॲड.रवींद्र बिराजदार ( वय ४४ ) या सहा वकिलांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वकीलासाठी कसलेही सुरक्षा कवच नाही,त्यांच्या मागे वारसांना कसलीही आर्थिक सुरक्षा नाही, वकिलाचा अनेक बाबतीत थेट संपर्क पक्षकाराशी येतो त्यामुळे वकिलांना कोरोना संसर्ग जास्त आहे. वकील लोकांना तातडीने लसीकरण करण्याची गरज आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा वकिलांचा मृत्यू या लाटेत झाला आहे.अनेक वकिलांचे नातेवाईक यात बळी पडले आहेत.वकिलांच्या वारसांना शासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे. शासनाने वकिलांच्या वारसांना तात्काळ 25 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी जिल्हा विधिज्ञ मंडळचे अध्यक्ष अँड नितीन भोसले यांनी केली आहे.