उमरग्यात मराठा तरुणांकडून रोष व्यक्त
![s](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/7a8c7e3be5453d4e9c21a154cc042a76.webp)
उमरगा - मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्य न्यायालयाने बुधवारी महत्वाचा निकाल दिला. यामध्ये सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या कायद्याला न्यायालयीन प्रक्रियेत टिकविण्यात राज्य सरकार आणि केंद सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकारला यांचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात भोगावे लागतील असे मत छावा क्रांतिवीर सेनेचे उमरगा तालुकाध्यक्ष विष्णू भोसले यांनी व्यक्त केले आहे.
आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना शासनाच्या मराठा आरक्षणावर विषयक उपसमिती कडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. व यामुळे मराठा समाजाला आज दुर्दैवी अशा निकालाला सामोरे जावे लागत आहे. कालचा दिवस हा मराठा समाजासाठी काळा दिवस होता. या निकालामुळे मराठा समाजातील नागरिकांचे व खास करून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
याबाबत सरकारने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावीत अन्यथा सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. व यापुढे आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होईल. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी छावाचे सुमित घोटाळे, अमोल पाटील, शैलेश लोखंडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.