दिशाहीन तसेच 'अर्थ' नसलेला संकल्प - आ. कैलास पाटील
![दिशाहीन तसेच 'अर्थ' नसलेला संकल्प - आ. कैलास पाटील](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/85e6d44687192dc142d7d4a573d6131f.jpg)
उस्मानाबाद - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी दिशाहीन तसेच 'अर्थ' नसलेला संकल्प म्हटले आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात सरकार विरोधी पक्षाचे असल्याचा राग केंद्र सरकारने अर्थसंकल्पातुन दाखवुन दिला आहे. नाशिक व नागपुर मेट्रो वगळता राज्याला अर्थसंकल्पातुन काहीच मिळालेले नाही. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे भव्य स्वप्न दाखवून शेतकर्यांना खूश करण्याचे काम अर्थमंत्र्यांनी गेल्यावर्षी केले. त्यासाठी काय करणार याविषयी त्या अर्थसंकल्पातही काहीच भाष्य केले नव्हते व आता वर्षभरानंतर काय झाल यावरही अर्थमंत्र्याने एक शब्द काढला नाही.
देशाला दिवसा स्वप्न दाखवणारी केंद्राची भुमिका घातक ठरण्याची भिती वाटते, 20 लाख शेतकर्यांना स्वतंत्र सौरपंप बसवण्यासाठी निधी देण्याचे आश्वासनही गेल्यावेळी दिले. सौरपंप बसवण्यासाठी 15 लाख शेतकर्यांना आर्थिक साह्य केले जाईल, असेही सांगितले होते. त्यातील किती योजना यशस्वी झाल्या, शेतकर्यांना याचा किती फायदा झाला? याचे उत्तरही देशाला मिळाले नाही.
गेल्या वर्षी शेती क्षेत्रासाठी 15 लाख कोटी कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. तसेच शेतकर्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय ठेवून 16 कलमी कार्यक्रमही त्यांनी जाहीर केला होता, ते तर झालच नाही. पण यावेळी तर शेतकरी अर्थसंकल्पातुन गायबच झाल्याचे दुर्देवी चित्र दिसुन आले आहे. एकाच वाक्यात अर्थसंकल्पाचे विश्लेषण करायच झाल तर , दिशाहीन तसेच 'अर्थ' नसलेला संकल्प असेच करावे लागेल.
नविन आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सितारामन यांनी महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. एकाच वाक्यात अर्थसंकल्पाचे विश्लेषण करायच झाल तर , फक्त आकड्यांचा खेळ बाकी सगळी फसवाफसवीच, असेही आ. कैलास पाटील यांनी म्हटले आहे.