ईटकुरचे तरूण शेतकरी अविनाश गंभीरे यांची आत्महत्या
![a](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/bd288d3e6010aa7fac93404349c59006.jpg)
उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील ईटकुर येथील तरूण शेतकरी अविनाश गंभीरे यांनी आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे व मानसिक त्रासामुळे आत्महत्या केल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांना समजताच त्यांनी बाळ नांदगावकर यांचेमार्फत उस्मानाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्याशी संपर्क साधून गंभीरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना जी काही मदत करता येईल यादृष्टीने तातडीने लक्ष द्यावे, असे सूचित केले.
घडलेली घटना दुर्दैवी आहे. आपण काही चिंता करू नका, आम्ही आपल्यासोबत आहोत, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गंभीरे परिवाराचे सांत्वन केले.
त्यानुसार मनसेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख हे ईटकुर येथील अविनाश गंभीरे यांच्या घरी दाखल झाले. अविनाश गंभीरे यांच्या लहान भावासोबत बाळा नांदगावकर यांनी संवाद साधून हकीकत ऐकून घेतली. अविनाश गंभीरे यांची थोरली कन्या एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत आहे. याकरिता मनसे नेते बाळा नादगांवकर यांनी योग्य ती मदत करण्याची सूचना आपल्या पदाधिकार्यांना केली. आपण काही चिंता करू नका आम्ही आपल्या सोबत आहोत असा धीर देऊन त्यांनी गंभीरे परिवाराचे सांत्वन केले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेन्द्र गपाट, तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख, मनसे राज्य वीज कामगार विभागाचे सचिव विशाल कांबळे, शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण, कळंब तालुका सचिव गोपाळ घोगरे, वाशी तालुका उपाध्यक्ष विक्रम गपाट तसेच ईटकुर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.