गावातील अतिक्रमण काढले नाही म्हणून दाऊतपूरचे सरपंच बंकट शिंदे अपात्र 

औरंगाबादचे अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांचा निर्णय 
 
s
सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांचा दणका 

उस्मानाबाद -  दाऊतपूरच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांसह चार जणांचे अतिक्रमण न काढता  कर्तव्यात कसूर केली म्हणून सरपंच बंकट बलभीम शिंदे यांना औरंगाबादचे अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी अपात्र ठरवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सरपंचामध्ये खळबळ उडाली आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर येथील ग्रामपंचायत सदस्य पल्लवी प्रशांत थोरात यांचे पती प्रशांत वसंत थोरात तसेच दीर समाधान वसंत थोरात यांनी गावठाण जागेवर अतिक्रमण केले होते. तसेच आणखी एक ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मारुती बनसोडे आणि त्यांचे चुलत भाऊ सचिन लक्ष्मण बनसोडे यांनी देखील गावठाण जागेवर अतिक्रमण केलं होते, त्याची तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी ग्रामसेवक आणि सरपंचाकडे केली असता त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. 

त्यानंतर सुभेदार यांनी उस्मानाबाद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता, ग्रामसेवकाची एक वेतनवाढ रोखण्यात आली. तसेच याप्रकरणी त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओकडे अहवाल सादर केला असता, सीईओने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवल्याने, ग्रामपंच्यात सदस्य पल्लवी प्रशांत थोरात आणि प्रवीण मारुती बनसोडे या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते , तसेच सीईओने सरपंच बंकट बलभीम शिंदे यांनी कर्तव्यात कसूर केली म्हणून औरंगाबादचे अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठवला होता. 

त्याची सुनावणी अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्यासमोर झाली असता अतिक्रमण न काढता कर्तव्यात कसूर केली म्हणून सरपंच बंकट बलभीम शिंदे यांना अपात्र ठरवले  आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सरपंचामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणात सुभेदार यांनी स्वतःची बाजू स्वतः मांडली, हे विशेष.

From around the web