उस्मानाबाद जिल्ह्यातील पीकविम्यासंदर्भात आ. कैलास पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
![as](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/25be85c7f50c07a618d8b3a0c5d4cf84.jpg)
उस्मानाबाद - जिल्ह्यातील पीकविम्याच्या प्रश्नावर उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील व शिवसेनेचे कळंब तालुकाप्रमुख शिवाजी (आप्पा) कापसे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कृषी सचिव यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या असून शेतकर्यांच्या खात्यात लवकरात लवकर विमा रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिली असल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली.
सन 2020 च्या पीकविम्यासंदर्भात जिल्ह्यातील शेतकर्यांच्या न्यायालयीन लढाईला यश मिळाले असले तरी विमा कंपनीच्या गलथान कारभार आणि पुढे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता ओळखून रिट पिटिशन दाखल करून विमा कंपनीला शेतकर्यांच्या हक्काचे पैसे देण्यास भाग पाडण्यासाठी आपल्या स्तरावरुन लक्ष घालण्याची विनंती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केली. तसेच कंपनीस नुकसानभरपाई तातडीने देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कृषी सचिवांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या असून लवकरात लवकर शेतकर्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वीच राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांची देखील खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पीकविमा प्रश्नावर चर्चा केली. त्यावर कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी तात्काळ कृषी आयुक्त धीरजकुमार यांना विमा कंपनीशी पत्रव्यवहार करून पीकविम्यापासून वंचित सर्व शेतकर्यांच्या बँक खात्यावर येत्या 15 दिवसात विम्याची रक्कम जमा करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.