उस्मानाबाद जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी
![d](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/f677393c2e3680de0c1dc75939531330.jpg)
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी १६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. या बँकेत १५ संचालक निवडून येणार असून सर्व पक्षाच्या नेत्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला सोडीत केवळ मृतावस्थेत असलेल्या जिल्हा बँकेला ऊर्जीतास्थेत आणण्यासाठी व तिचे गेलेले गतवैभव मिळावे यासाठी कोणत्याही परिस्थितीत या बँकेची निवडणुक प्रक्रीया बिनविरोध व्हावी सच्ची यासाठी ९५ टक्के प्रयत्न यशस्वी झाले असून फक्त ५ टक्के प्रयत्न बाकी असून ते करण्यासाठी माध्यमांनी भूमिका मांडावी. तसेच त्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनीच प्रयत्न करावेत, असे कळकळीचे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आ.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.८ फेब्रुवारी रोजी केले.
शिंगोली येथील सर्कीट व्हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अा.कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सतिश सोमाणी, जिल्हा परिषदेचे सभापती दत्ता साळुंखे, जि.प.उपाध्यक्ष धनाजी सावंत, प्रशांत चेडे, संजय गाढवे, माजी अा.ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सावंत म्हणाले की, जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक होती. मात्र आज या बँकेत ज्या शेतकरी, सभासद व ठेवीदार यांनी डिपॉझीट ठेवलेले आहे. त्या ठेवी देखील परत देऊ शकत नाही, त्यामुळे या निवडणुकीसाठी निवडणुक लढविताना किमान त्या शेतकऱ्यांचा ठेवीदारांचा विचार करून बँकेला चांगले दिवस आणण्याचे दिवास्वप्न दाखवून निवडणुक लढत आहेत. ते केंव्हाही वास्तवात उतरू शकत नसल्यामुळे सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अर्ज माघार घेण्यास सांगून ही निवडणूक कोणत्याही परिस्थित बिनविरोध होईल यासाठीच प्रयत्न करावेत.
इतर जिल्हा बँका शून्य टक्के व्याजाने कर्ज शेतकऱ्यांना देतात. आपण देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशा पध्दतीचे कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो. यासाठी ध्येय व उद्दिष्ट समोर ठेवून ही बँक पुन्हा पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगार करण्यासाठी या बँकेत पैसे उपलब्ध होत नाहीत. याचे लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तसेच ज्यांना बँकींग क्षेत्राचा अनुभव नाही व अकाऊंटची माहित नसलेल्या लोकांनी निवडणूक लढविली तर ते योग्य ठरणार नाही. तसेच मरणास्थेत असलेल्या या बँकेच्या संचालकांनी विकासाचा स्त्रोत उभा करायचा असेल तर कुटीर उद्योग चालले पाहिजेत. त्यासाठी तुळजाभवानी व तेरणा कारखाना देखील चालने गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र विकासात अडथळा झाला पाहिजे, विकास खुंटला पाहिजे यासाठी कांहीजण प्रयत्न करतात. त्यामुळे जिल्ह्याचे मागासलेपण कसे दूर होत नसल्याने ते दूर करण्यासाठी राजकारण विरहीत सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घातला तर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याची ताकद आहे. ही बँक बिनविरोध करून नवीन रोल मॉडेल करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहजे. मात्र मढ्याच्या कडेला बसून पोळ्या खाण्यात काही उपयोग नाही, असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले.
बँक व तेरणा सुध्दा फुलविणार
जिल्हा बँक बिनविरोध निघाली तर या बँकेला पुन्हा पुर्वीचे गतवैभव देऊ तसेच तेरणा कारखाना जर सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आमच्याकडे आला तर या कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यात गाळपासाठी येऊन पुन्हा धुर निघेल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याबरोबरच दोन्ही संस्थांना पुन्हा गतवैभव देऊन फुलविणार असून जिल्हावासियांना देखील सुवर्ण दिवस येतील, असे आश्वासन तानाजी सावंत यांनी दिले.
सर्व नेत्यांचे समुपदेशन होणे गरजेचे
जिल्ह्याचा विकास होण्यासाठी सर्व पक्षांनी राजकीय हेवेदावे बाजूला सारणे आवश्यक आहे. निवडणुका संपल्यानंतर सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून विकासासाठी एकत्र येणे अत्यावश्यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही ही मोठी शोकांतिका आहे. जिल्ह्याचा विकास होत नसल्यामुळे जिल्हा मागास राहिलेला आहे त्यामुळे विकास करून जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींचे समुपदेशन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.