कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचा धोका !
![कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचा धोका !](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/b79f5ea9d0a26b09dfb85cbc8fa8df0c.jpg)
देशात कोरोनाने थैमान घातले असून, दुस-या लाटेत हे संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. त्यातच बरे होणा-या रुग्णांना दुस-याच आजाराने घेरले आहे. म्युकरमायकोसिस असे या आजाराचे नाव असून, हा बुरशीजन्य आजार आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे, अशा कोरोनातून बाहेर पडलेल्या व्यक्तीला साईड इफेक्टमुळे याची लागण होत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या आजाराला काळी फंगस म्हणूनही ओळखले जाते. या आजाराचे रुग्ण मागच्या काही दिवसांतून आढळत आहेत. यात सर्वाधिक धोका अंध होण्याचा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भविष्यात याचा धोका वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनातून बरे होणा-या रुग्णांमध्ये आता जीवघेण्या म्युकरमायकोसिस या बुरशी इन्फेक्शनचा धोका वाढत आहे. चेह-याभोवतीच्या हाडाच्या पोकळीत म्युकरमायकोसिस आजार होतो. डोळे व मेंदूवर त्याचा परिणाम होतो. कोरोना उपचारादरम्यान साईड इफेक्टमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना हा आजार होतो. त्यावर उपचार करण्यासाठी फोटेरिसीन बी या इंजेक्शन वापराने इलाज होतो. त्यामुळे आतापासूनच सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
म्युकरमायकोसिसचे गुजरातमध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. यातील ५० रुग्णांवर उपचार केले गेले आहेत. मात्र, आणखी ६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यातील ७ जणांनी डोळे गमावले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अंध होण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात सुरतमधील जिल्हा रुग्णालयाचे निवास वैद्यकीय अधिकारी केतन नाईक यांनी सांगितले की, अशा रुग्णांची येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अहमदाबाद येथील अशर्व रुग्णालयाचे डोळे, नाक , घसा तज्ज्ञ डॉ. देवांग गुप्ता यांनी आमच्या रुग्णालयात रोज ५ ते १० रुग्ण दाखल होत आहेत. प्रति ५ रुग्णांमध्ये किमान एका रुग्णाची डोळ््याची समस्या आहे. या आजारात बरेच रुग्ण अंध झाले आहेत, असे सांगितले.
म्युकरमायकोसिस हा पर्यावरणातील एक भाग आहे. प्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्ती याचा बळी ठरतात. अशा रुग्णांना डोकेदुखी, ताप, डोळ्याचा खालचा भाग दुखणे, नाक बंद होणे असे लक्षणे आढळून येतात. यावरील उपचार खूप महागडे आहेत. २१ दिवसांचा इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करावा लागतो. त्यात एका इंजेक्शनची किंमत किमान ९ हजार रुपये आहे. हे लक्षात घेता केवळ इंजेक्शनचाच २ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. मुंबई येथील केईएम रुग्णालयाचे ईएनटी तज्ज्ञ डॉ. हेतल मरफतिया यांनी मागच्या दोन आठवड्यापासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. येथे रोज दोन ते तीन रुग्ण दाखल होत आहेत, असे सांगितले.
महाराष्ट्रात २०० रुग्णांवर उपचार
एकीकडे गुजरातमध्ये ही समस्या गंभीर बनत चालली असताना महाराष्ट्रातही असे रुग्ण आढळत आहेत. राज्यात आतापर्यंत २०० रुग्ण आढळले असून, म्युकरमायकोसिसमुळे आतापर्यंत ८ जण अंध झाले असल्याचे सांगण्यात आले. हे सर्व रुग्ण नुकतेच कोरोनातून बरे झाले होते. सर्व रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
आजार चिंताजनक : डॉ. लहाने
यासंदर्भात महाराष्ट्रातील आरोग्य शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, हे रुग्ण कोरोनातून बरे होऊन बाहेर पडले आहेत. मात्र, प्रतिकारशक्ती कमी असल्याने अनेक रुग्णांवर फंगल इन्फेक्शन होत आहे. हा आजार नवा नाही. परंतु कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना याची लागण होणे चिंताजनक आहे. स्टेरॉईडच्या अतिवापरातून शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत आहे, तर काही औषधी शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करत आहेत. अशा रुग्णांवर सहजगत्या फंगल इन्फेक्शन होते. असे संक्रमण झालेल्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी एका रुग्णाचा एक डोळा काढावा लागला, असेही त्यांनी सांगितले.
औषधही महागडे
म्युकरमायकोसिस या आजाराच्या निदानासाठी असलेले हे औषध खुप खर्चिक आहे. आज ज्याप्रमाणे कोरोनावर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्याचप्रमाणे या इंजेक्शनचा तुटवडा भविष्यात वाढू शकतो. त्यासाठी आताच नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
आजाराविषयी जनजागृती करावी
म्युकरमायकोसिस संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्याला सूज येणे, लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नाक, कान, घसा तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. त्यासाठ चाचण्या व तपासण्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.