नेरूळचे  वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला मंजूर होते, याबाबतचा एकतरी पुरावा खासदारांनी द्यावा

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांचे खुले आव्हान 
 

उस्मानाबाद - उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरून आ.  राणाजगजितसिंह पाटील आणि खा.  ओमराजे निंबाळकर यांच्यात एकीकडे 'कलगीतुरा रंगला असताना यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर  उडी घेतली आहे. नेरुळचे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात परत आणा , असे म्हणणाऱ्या खा. ओमराजे निंबाळकर यांच्यावर राजसिंह राजेनिंबाळकर यांनी सडकून टीका केली आहे. नेरूळचे  वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला मंजूर होते, याबाबतचा एकतरी पुरावा खासदारांनी द्यावा, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. 


सराईत गुन्हेगाराप्रमाणे खोटे बोलण्यात पटाईत असलेल्या खासदारांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. उस्मानाबादला ३० वर्षा पूर्वी वैद्यकीय महाविद्यालय कधीही मंजूर झालेले नव्हते, मग ते नेरूळला नेण्याचा विषयच नाही, हे त्यांना चांगलेच ठाऊक असताना देखील केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशी  वक्तव्ये खासदार अधून मधून करत राहतात. आपण केलंय अस त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नसल्यानं ही वायफळ बडबड आहे, असे राजसिंह राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे.  

जिल्ह्यातील जनतेचा त्यांच्या बोलण्यावर काडी मात्र विश्वास नाही. नेरूळ येथील वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला मंजूर होते, याबाबतचा एकही पुरावा खासदारांनी द्यावा असे माझे त्यांना उघड आव्हान आहे . तुम्ही व आमदार कैलास पाटील यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी काय काय पाठपुरावा केला, किती पत्र दिली, किती बैठका आयोजित केल्या, या बैठकीत काय निर्णय झाले व त्यावर महत्त्वाचे म्हणजे कधी व काय अंमलबजावणी झाली याची माहिती जनते समोर मांडावी. यातून निश्चितच दूध का दूध व पाणी का पाणी होईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. 

पिक विमा च्या बाबतीत देखील अशीच खोटारडी वक्तव्ये खासदाराकडून केली जात होती. तेव्हाही आमचे नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पीक विम्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे एक बैठक लावून किमान आपली लायकी सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. मात्र तेही यांना झेपले नाही. जिल्ह्यातील जनता अतिशय सुज्ञ असून कोणाची कुठे काय किंमत आहे, कोणाची काय प्रतिमा आहे, ही चांगली ओळखते. अशा भूल थापांना जिल्हावासीय कदापी बळी पडत नाहीत, पडले नाहीत व पडणार नाहीत. त्यामुळे खासदारांनी जपून विधाने करावीत, पुरावे सादर करावेत अन्यथा जिल्हावासियांची जाहीर माफी मागावी, असेही 
 राजसिंह राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे. .